ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसैनिकांना पत्र लिहिले आहे (फोटो - सोशल मीडिया)
मुंबई : राज्यामध्ये विधानसभा निवडणुकीनंतर जोरदार राजकारण रंगले आहे. विधानसभेचा निकाल महायुतीच्या बाजूने पूर्णपणे एकतर्फी लागला. तर महाविकास आघाडीचा दारुण पराभव झाला. यामुळे महाविकास आघाडीचे अनेक नेते नाराज असून एकमेकांवर आरोप करत आहेत. यामध्ये ठाकरे गटाला मोठी गळती लागली आहे. राजन साळवी यांनी देखील शिवबंधन मोडून धनुष्यबाण हाती घेतला आहे. राजन साळवी यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. ठाकरे गटामधील नेते हे पक्ष सोडून का जात आहेत याबाबत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कारण सांगितले आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते हे पक्ष सोडून जात आहेत. यामुळे उद्धव ठाकरे यांना धक्का बसत आहे. शिवसैनिक आणि पदाधिकारी पक्ष सोडून का जात आहे? त्याचे कारण शिवसेना उबाठाचे नेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. दानवे म्हणाले की, समोरच्या लोकांनी बाजार मांडला आहे. पैशांची ऑफर दिली जाते. कामांची ऑफर दिली जात आहे. खरेदी विक्रीचा व्यवहार केला जात आहे. या सगळ्या लोकांनी मांडला आहे. बाजारात मांडलेले लोक जात असतील तर याचा आम्हाला अजिबात दुःख नाही, असे अंबादास दानवे यांनी म्हटले आहे. अंबादास दानवे यांनी शिवसेना ठाकरे गटाला गळती लागण्याचे कारण सांगितले आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
माध्यमांशी संवाद साधताना अंबादास दानवे यांनी अनेक राजकीय विषयांवर भाष्य केले. यावेळी दानवे यांनी कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांचा खरपूस समाचार घेतला. माणिकराव कोकाटे यांनी शेतकऱ्यांच्या विमाबाबत वक्तव्य करताना वादग्रस्त विधान केले. यावरुन टीका करताना अंबादास दानवे म्हणाले की, कृषिमंत्री भिकाऱ्यांची उपमा शेतकऱ्यांना देत आहेत. ज्या शेतकऱ्यांना आपण अन्नदाता म्हणतो, त्यांच्याबाबत ही भाषा शोभणारी नाही. शेतकऱ्यांना एक रुपयांत विमा देवून सरकार उपकार करत नाही. याच शेतकऱ्यांच्या बळावर त्यांचे राज्य चालले आहे. या सरकारने शेतकऱ्यांचा अनेक अनुदान योजना थांबवल्या आहेत, अशी टीका अंबादास दानवे यांनी केली आहे.
ऑपरेशन टायगर थांबणार नाही असे योगेश कदम म्हणाले होते, त्यावर बोलताना अंबादास दानवे म्हणाले, “योगेश कदम यांना काही माहीत नाही. ते अजून लहान आहेत. त्यांना अजून संघटनाही माहीत नाही. बापाच्या बळावर काम करणे सोपे असते. पण संघटना उभी करणे अवघड असते. या प्रकारच्या घोषणा आणि वल्गना करणारे खूप आले आणि गेले आहेत. उद्धव साहेबांचे नेतृत्वात शिवसेना तळपत्या तलवारीसारखी येत्या काळात उभा राहील,” असा विश्वास अंबादास दानवे यांनी व्यक्त केला.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
पुढे अंबादास दानवे म्हणाले की, बीडमधील गुंडागर्दी धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्याशिवाय संपणार नाही. सरकारची इच्छा गुंडागर्दी संपवायची अशी दिसत नाही. सरकारला अशीच गुंडागर्दी चालवायची आहे. त्यांना बीडचा बिहार करायचा आहे.धनंजय मुंडे यांनी नैतिकदृष्ट्या राजीनामा दिल्यानंतरच इथली गुंडागर्दी संपेल. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुंभमेळ्यास जाणार याचा अर्थ बरेच पाप त्यांनी केलेले असतील. ते धुवायला चालले असतील. त्याच्यावर काय बोलावे, असा टोला अंबादास दानवे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला.