
‘जीव महत्त्वाचा, शॉर्टकट नको’; अंबरनाथ-बदलापूर रेल्वे मार्गावर ‘झिरो डेथ’ अभियान, अपघात रोखण्यासाठी पोलिसांची मानवी साखळी
या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीस प्रशासनाने नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी अनोखी मोहीम हाती घेतली. यामध्ये पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच स्थानिक स्वयंसेवकांनी रेल्वे मार्गालगत मानवी साखळी उभी करून नागरिकांना सुरक्षिततेचा संदेश दिला. रेल्वे ट्रॅक ओलांडण्यासाठी अधिकृत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले. या मोहीमेदरम्यान ट्रॅक ओलांडणाऱ्या नागरिकांना गुलाबाचे फूल देऊन त्यांना सुरक्षिततेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. “काही मिनिटांचा शॉर्टकट जीवावर बेतू शकतो” हा संदेश देत रेल्वे रुळांवरून अनधिकृतपणे ये-जा करणे किती धोकादायक आहे, याची माहिती देण्यात आली.
मध्य रेल्वेच्या डीसीपी प्रज्ञा जेडगे आणि कल्याण रेल्वे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही जनजागृती मोहीम राबवण्यात आली आहे. पोलिसांनी नागरिकांना रेल्वे फाटक, पादचारी पूल किंवा अधिकृत मार्गांचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. मोबाईलवर बोलत, हेडफोन लावून किंवा घाईगडबडीत रेल्वे ट्रॅक ओलांडल्यामुळे अनेक अपघात घडत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. रेल्वे प्रशासन आणि पोलिसांच्या संयुक्त प्रयत्नातून राबविण्यात येणाऱ्या या ‘झिरो डेथ’ अभियानाचा उद्देश केवळ नियमांचे पालन करवून घेणे नसून, नागरिकांच्या मनात रेल्वे सुरक्षेबाबत जागरूकता निर्माण करणे हा आहे. अपघातमुक्त रेल्वे परिसर निर्माण करण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. मोरीवली परिसरातील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर ही मोहीम महत्त्वाची मानली जात असून, भविष्यात अशा घटनांवर आळा बसावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
रेल्वे अपघात टाळण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून, सुरक्षित प्रवासासाठी नियमांचे पालन करण्याचे आवाहन रेल्वे प्रशासन आणि पोलिसांकडून करण्यात आले आहे.