केंद्रीय गृहमंत्री अमित शहा
वाशी येथील सिडको एक्झिबिशन अँड कन्व्हेंशन सेंटरमध्ये केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागाच्या वतीने आयोजित ‘हिंदी दिवस २०२६’ आणि ‘सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलना’चे उद्घाटन अत्यंत उत्साहात संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी व्यासपीठावर केंद्रीय गृह राज्यमंत्री नित्यानंद राय, खासदार नरेश म्हस्के, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजभाषा विभागाच्या सचिव अंशुली आर्या, व्ही.एल. कांताराव, बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांचे वंशज जॉयदीप चट्टोपाध्याय, मिलिंद प्रभाकर सबनीस हे मान्यवर उपस्थित होते. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले की, राजभाषा संमेलने केवळ राजधानी दिल्लीपुरती मर्यादित न ठेवता देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये नेण्याचा केंद्र शासनाचा निर्णय यशस्वी ठरला असून, या उपक्रमांतर्गत हे सहावे संमेलन महाराष्ट्रात होत आहे.
Devendra Fadnavis : ‘हिंदी माझी मावशी, मराठी माझी आई,’ अमित शाहांसमोर फडणवीसांचं मोठं वक्तव्य
महाराष्ट्रातील गणेशोत्सव आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती उत्सवाला लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी व्यापक स्वरूप देऊन देशात सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि देशभक्तीची भावना चेतवली. छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वशासनासोबतच स्वधर्म आणि स्वभाषेला अग्रक्रम देत मराठीच्या विकासासाठी राजव्यवहार कोश तयार केला होता. तसेच गुलामगिरीच्या काळात ऋषी बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी ‘आनंदमठ’मध्ये रचलेले ‘वंदे मातरम्’ हे केवळ एक गीत नसून स्वातंत्र्यलढ्याची राष्ट्रीय उद्घोषणा ठरले होते. ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शासकीय समारंभांमध्ये ‘वंदे मातरम्’ पूर्ण स्वरूपात सादर करण्याची परंपरा पुन्हा सुरू केली आहे, तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा बहुमान देऊन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक अस्मितेचा गौरव केला आहे.
मातृभाषेचे महत्त्व विषद करताना गृहमंत्री म्हणाले की, मातृभाषा ही मानवी विचारप्रक्रियेचा मूळ पाया असून ती व्यक्तीला स्वतःच्या संस्कृती, परंपरा आणि मूल्यांशी जोडून ठेवते. याच कारणास्तव राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणावर भर देण्यात आला आहे. यासोबतच देशाशी नाते अधिक दृढ करण्यासाठी प्रत्येक विद्यार्थ्याने किमान एक तरी अन्य भारतीय भाषा शिकली पाहिजे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राजभाषा विभागाने तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर सुरू केला असून, भारत सरकारच्या पाच लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांना हिंदीचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित ‘कंठस्थ २.०’ प्रणाली पाच कोटींपेक्षा अधिक वाक्यांसह उपलब्ध करण्यात आली असून ‘लीला राजभाषा’ व ‘लीला प्रवाह’च्या माध्यमातून भाषा शिक्षणाला गती मिळाली आहे. सुरुवातीला ५१ हजार शब्द असलेला ‘हिंदी शब्दसिंधू’ शब्दकोश आता आठ लाख शब्दांपर्यंत विस्तारला असून २०२९ पर्यंत तो जगातील सर्वांत मोठा शब्दकोश बनेल, असा ठाम विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.






