दिशा सालियन प्रकरणावर रामदास कदमांचा गंभीर आरोप
Disha Salian Case : दिशा सालियन मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी आलं आहे. या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (शिंदे गट) नेते रामदास कदम यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर सवाल उपस्थित केले आहेत.
रामदास कदम यांनी ‘सत्यमेव जयते’चा उल्लेख करत न्यायालयाच्या माध्यमातून या प्रकरणाला पुढे जाण्याचा मार्ग मिळाल्याचं म्हटलं. दिशा सालियन यांच्या मृत्यूशी संबंधित सर्व बाजूंची सखोल चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली.
रामदास कदम यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्या काळात या प्रकरणातील पुरावे नष्ट करण्यात आले का? याची चौकशी झाली आहे का? असा सवाल त्यांनी केला.
दिशा सालियन यांच्या वडिलांनी आदित्य ठाकरे यांचं नाव घेतल्याचा दावा करत कदमांनी या प्रकरणात अधिक सखोल तपासाची मागणी केली. या प्रकरणात न्यायालयाच्या आदेशानुसार पुढील कारवाई सुरू झाल्याचंही त्यांनी म्हटलं.
आदित्य ठाकरे यांच्या कथित नाईट लाइफवरूनही रामदास कदमांनी सवाल उपस्थित केला. ‘आदित्य ठाकरे रात्री बारा वाजता कुठे जायचे आणि सकाळी सहा वाजता कुठून यायचे?’ असा प्रश्न त्यांनी विचारला. याचवेळी कदमांनी ‘बाळासाहेबांनी कमावलं आणि या लोकांनी गमावलं’, अशी बोचरी टीका आदित्य ठाकरे यांच्यावर केली.
दरम्यान, रामदास कदम यांनी मनोज जरांगे यांच्या मराठा आरक्षण आंदोलनावरही भाष्य केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं हीच जरांगेंची भूमिका आहे, मात्र सणासुदीचे दिवस असल्याने त्यांनी संयम ठेवावा, असं कदम म्हणाले. आरक्षण देताना ओबीसी समाजावर अन्याय होऊ नये, ही सरकारची भूमिका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.






