
रोबोटच्या मदतीने कापूस वेचणीचा नवा अध्याय, परिसरातील शेतकऱ्यांना तंत्रज्ञानाचा दिलासा (फोटो सौजन्य-Gemini)
अकोला : कापूस वेचणीसाठी लागणारा प्रचंड श्रमखर्च, मजुरांची टंचाई आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देणारे रोबोट आधारित वेचणी यंत्र लवकरच प्रत्यक्ष शेतात उतरवण्याच्या दिशेने महत्त्वाची पावले उचलली जात आहेत. पुणे येथील अभियंता व जोश कंपनीचे संचालक डॉ. शरदचंद्र लोहकरे यांनी विशेषतः कापसासाठी विकसित केलेल्या या अत्याधुनिक यंत्राच्या चाचण्या अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या कापूस प्रक्षेत्रावर घेण्यात आल्या.
जून २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत विविध टप्प्यात पार पडलेल्या चाचण्यांमध्ये रोबोटने ६० ते ७० टक्क्यांपर्यंत कापूस वेचणी यशस्वीरीत्या केली. प्रारंभी काही तांत्रिक अडचणी समोर आल्या असल्या तरी त्या दूर करण्यासाठी आवश्यक सुधारणा सुरू आहे. पुढील
हंगामात अधिक कार्यक्षम स्वरूपात सुधारित मॉडेलची पुन्हा चाचणी घेतली जाणार असल्याची माहिती डॉ. लोहकरे यांनी दिली. सध्या कापूस वेचणीसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र ग्रामीण भागात मजुरांची उपलब्धता कमी होत असून वेचणीचा खर्च झपाट्याने वाढत आहे. वेळेत वेचणी न झाल्यास उत्पादन आणि गुणवत्तेवर परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर रोबोट आधारित वेचणी यंत्र शेतकऱ्यांसाठी क्रांतिकारी ठरू शकते, असे तज्ज्ञांचे मत आहे.
Shocking : पैशाच्या वादातून हत्या, कालव्यात आढळला जळालेला मृतदेह; खुनाचा थरारक कट उघडकीस
या रोबोटला एक, दोन तसेच चार हातांची रचना देण्यात आली आहे. प्रत्येक हात स्वतंत्रपणे बोंडातून कापूस वेचती. सेन्सर आणि स्मार्ट नियंत्रण प्रणालीच्या साहाय्याने केवळ पूर्ण उमललेला कापूस वेचला जातो, त्यामुळे कच्च्या बोंडांना इजा होत नाही आणि पुढील वेचणीसाठी पीक सुरक्षित राहते. यापूर्वी ट्रॅक्टरचलित वेचणी यंत्रांचे प्रयोग करण्यात आले होते. मात्र त्यामध्ये कचऱ्याचे प्रमाण वाढणे, कापसाची गुणवत्ता घसरणे आणि शेतात मोठ्या हालचालींमुळे झाडांचे नुकसान होणे अशा समस्या आढळल्या. त्यामुळे ती यंत्रे अपेक्षित यश मिळवू शकली नाहीत. त्याच्या तुलनेत रोबोट आधारित यंत्र अधिक अचूक, कमी कचरा निर्माण करणारे आणि पिकासाठी सुरक्षित असल्याचे प्राथमिक चाचण्यांतून स्पष्ट झाले आहे. चाचण्यांदरम्यान वेग, पकड यंत्रणेची अचूकता तसेच विविध वाणांतील बोंडांच्या आकारानुसार समायोजन यामध्ये काही सुधारणा आवश्यक असल्याचे निदर्शनास आले. त्यानुसार पुढील काही महिन्यांत सुधारित मॉडेल विकसित करून पुन्हा प्रात्यक्षिक चाचण्या घेतल्या जाणार आहेत. यंत्राची कार्यक्षमता ८५ ते ९० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट असल्याचे डॉ. लोहकरे यांनी सांगितले.
कृषी तज्ज्ञांच्या मते, हे रोबोट यंत्र व्यावसायिक स्वरूपात उपलब्ध झाले तर कापूस शेतीत यांत्रिकीकरणाचा नवा अध्याय सुरू होईल. वेचणीचा खर्च मोठ्या प्रमाणावर कमी होईल, वेळेवर पीक हातात येईल ऑणि शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल.