संगमनेरमध्ये दहशत निर्माण करण्याचा डाव, गावगुंडांचा बंदोबस्त करा; बाळासाहेब थोरातांचे आवाहन
संगमनेर : कीर्तनकर संग्राम भंडारे यांनी काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांना थेट धमकी दिली आहे. आम्हाला नथुराम गोडसे व्हावे लागेल, असं भंडारे यांनी म्हटलंय. संगनेर तालुक्यातील घुलेवाडी या गावात संग्राम भंडारे यांच्या कीर्तनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कीर्तनामध्ये भंडारी यांनी बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केल्याचा थोरात समर्थकांचा दावा आहे. यावरुन आता संगमनेरमध्ये थोरात समर्थक आक्रमक झाले आहेत. संग्राम भंडारे यांचा निषेध करण्यासाठी संगमनेर तालुक्यातील 25000 नागरिकांनी एकत्र भव्य शांती मोर्चा काढला. यावरुन आता बाळासाहेब थोरात संतापले आहेत. अशांतता निर्माण करणाऱ्या गावगुंडांचा बंदोबस्त करा, असे आवाहन काँग्रेसचे वरिष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी जनतेला केले आहे.
स्वाभिमानी संगमनेर तालुका, सकल हिंदू समाज व विविध पुरोगामी संघटना आणि महाविकास आघाडी आणि विविध आध्यात्मिक व वारकरी संघटना आणि राजकीय पक्षांच्या वतीने बाळासाहेब थोरात यांना धमकी दिल्याच्या निषेधार्थ भव्य सद्भावना शांती मोर्चा संपन्न झाला. यामध्ये तालुक्यातील 25000 नागरिकांनी सहभाग घेऊन यशोधन कार्यालय ते नवीन नगर रोड असा शांती मोर्चा केला.
यावेळी माजी मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, थोर स्वातंत्र्य सैनिक भाऊसाहेब थोरात यांचा मी मुलगा आहे. संघर्ष आपल्याला नवीन नाही. विचारांसाठी आणि तत्त्वासाठी बलिदान देण्याची आपली तयारी आहे. हिंदू धर्म आणि वारकरी संप्रदायाचे आम्ही पाईक आहोत. गगनगिरी महाराजांच्या सप्ताह मध्ये वाढण्यापासूनचे काम आपण केले आहे. गावोगावी मंदिरांचे बांधकाम व सुशोभीकरण आपण केले. सप्ताहांचे आयोजित केले. राष्ट्रपुरुष आणि संतांनी सांगितलेला मानवतेचा विचार घेऊन आपण पुढे चाललो. कधीही धर्माचा देखावा केला नाही. चुकीचा वागला त्याला शिक्षा झाली पाहिजे हा आग्रह आम्ही धरला.
नवीन लोकप्रतिनिधीने निवडणुकीच्या अगोदर कधी भगवी टोपी घातली होती का. भगवी टोपी घातली म्हणजेच हिंदू हे चुकीचे आहे. चाळीस वर्षांमध्ये हा तालुका आपण उभा केला. सुसंस्कृत राजकारणाची परंपरा निर्माण केली. सातत्याने विकास कामे करून तालुका राज्यात अग्रक्रमणाने पुढे नेला. हा विकास काहींना पाहवत नाही आणि म्हणून या लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून हत्यार म्हणून आपला तालुका मोडण्याचा षड्यंत्र आखले जात आहे. मागील आठ महिन्यांमध्ये तालुक्यामध्ये गुंडगिरी आणि दहशत वाढली आहे.
नवीन लोकप्रतिनिधी डीएनए शब्द वापरला त्याचा अर्थ तरी त्याला माहित आहे का. एक प्रकारची शिवी आहे. इतक्या खालच्या पातळीवरचे राजकारण तालुक्यात कधीही झाले नाही. तो तथाकथित महाराज नारदाच्या गादीचा अपमान करतो आहे. पाकीट घेऊन कीर्तन करतो आहे. त्याला राजकारण करायचे तर त्याने राजकीय स्टेजवर भाषण करावे. तालुक्यात दहशत निर्माण करण्याचा डाव आखला जात असून, गावोगावी गुंड दहशत माजवत आहेत. आपल्याला आपल्या तालुक्याची संस्कृती जपायची असून, तालुक्याच्या विकासाची वाटचाल सुरू ठेवण्यासाठी गुंडांना वेळीच रोखा, असे आवाहन थोरात यांनी केले.
डॉ. जयश्री थोरात म्हणाल्या की, तालुक्यामध्ये तरुणांवर खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत. दहशत निर्माण केली जात आहे. हे आम्ही चालू देणार नाही. नथुराम गोडसे हा आपला आदर्श नाही. दिखाऊ हिंदुत्व आपले नाही. कारण आपण खरे हिंदू आहोत. हा छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे. आणि तो विचार घेऊन आपण पुढे जात आहोत. यावेळी विविध संघटनांनी आपला पाठिंबा व्यक्त केला.
बाळासाहेब थोरात यांनी प्रशासनाला खडसावले
शांती मोर्चासाठी संगमनेर तालुक्यातील गावागावातून अनेक कार्यकर्ते गाड्या भरून संगमनेर शहरांमध्ये येत होते. मात्र या मोर्चामध्ये लोक येऊ नये याकरता पोलिसांनी चारही दिशांनी गाड्या अडवल्या ही बातमी कळताच माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पोलीस प्रशासनाला चांगलेच खडसावले. तुम्ही कोणाच्या घरचे घरगडी आहात का असा सवाल करताना हा अन्याय संगमनेर तालुका सहन करणार नाही, असा इशारा प्रशासनाला दिला.
थोरात समर्थकांकडून भंडारेंचा तीव्र निषेध
घुलेवाडी येथील घटनाही नियोजित षडयंत्र होते. यासाठी मागील दहा दिवसांपूर्वीच प्लॅनिंग सुरू असल्याचे विविध व्हिडिओ व पुरावे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी तमाम जनतेला दाखवले असून, प्रत्येक आरोपाचे खंडन करत हे षडयंत्र कसे रचले गेले संग्राम भंडारे कसा खोटा बोलत आहे. त्याच्यावर कोणताही हल्ला झाला नाही. भंडारे आणि नवीन लोकप्रतिनिधी यांचे हे षडयंत्र दाखवताना लाव रे तो व्हिडिओ म्हणत त्यांनी सर्व पुरावे सादर केले यावेळी तमाम जनतेने भंडारे याचा तीव्र निषेध केला