
वरठी परिसरातील एकलारी गावात सोमवारी सायंकाळी ५:३० वाजेच्या सुमारास महावितरणाच्या भोंगळ कारभाराचा आणखी एक गंभीर नमुना समोर आला. जिल्हा परिषद शाळेसमोर अचानक उच्च दाबाची जिवंत विद्युत तार तुटून खाली पडल्याने झालेल्या दुर्घटनेत तीन शेळ्यांचा जागीच तडफडून मृत्यू झाला. सुदैवाने, अपघात घडण्याच्या काही वेळ आधीच शाळा सुटल्यामुळे विद्यार्थी सुरक्षितपणे घरी पोहोचले होते, ज्यामुळे एक मोठा अनर्थ टळला. मात्र, महावितरणाच्या निष्काळजीपणामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी तीव्र रोष व्यक्त केला आहे.
घटनेच्या वेळी परिसरात मुसळधार पाऊस सुरू होता. स्थानिक शेतकरी बाबुराव बालपांडे यांच्या मालकीच्या शेळ्या नेहमीप्रमाणे गावातील रस्त्यावरून घराकडे परत येत होत्या. त्याचवेळी जिल्हा परिषद शाळेसमोरील वीज खांबावरील जिवंत तार अचानक तुटून रस्त्यावर पडली. या तारेचा थेट स्पर्श झाल्याने तीनही शेळ्यांचा क्षणात दुर्दैवी अंत झाला. या घटनेमुळे हतबल झालेल्या बाबुराव बालपांडे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, त्यांच्या उपजीविकेचे साधन हिरावले गेले आहे.
या अपघातानंतर एकलारीतील नागरिकांचा महावितरणविरोधात संताप उफाळून आला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर किंवा देखभालीच्या (मेंटेनन्स) नावाखाली महावितरणकडून केवळ थातूरमातूर कामे केली जातात, असा थेट आरोप ग्रामस्थांनी केला आहे. गावशिवार असो वा शेतशिवार, अनेक ठिकाणी वीजेच्या तारा धोकादायकरीत्या लोंबकळत आहेत. अनेक भागांत वीजेचे खांब वाकलेल्या अवस्थेत असून ते कोणत्याही क्षणी कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
महावितरणच्या या सातत्यपूर्ण दुर्लक्ष आणि निष्काळजीपणामुळे सर्वसामान्यांना अन् प्राण्यांना नाहक प्राणाला मुकावे लागत आहे. भविष्यात असा जीवघेणा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी लोंबकळणाऱ्या तारांची दुरुस्ती करावी, तसेच पीडित पशुपालक बाबुराव बालपांडे यांना तातडीने आर्थिक भरपाई देऊन निष्काळजी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी जोरदार मागणी ग्रामस्थांनी केली आहे.