
'वरोशी ठरावावरून बोंब मारणाऱ्यांची लायकी काय?'; आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते आक्रमक
मेढा : जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांनी कुसुंबी गटाच्या विकासावर भर दिला आहे. त्यामुळे वरोशी गावच्या सोसायटीवरून बोंब मारणाऱ्या पंचायत समिती सदस्य आतिश कदम यांनी प्रथम या सोसायटीचे सभासद होऊन दाखवावे. त्यांची लायकी काय? यापुढे जर रांजणेंवर बोलाल तर तुमचीही अंडीपिल्ली आमच्याकडे आहेत, असा सज्जड इशारा आंबेघर गणातील भाजप कार्यकर्त्यांनी अतिश कदमांना दिला.
मागील आठवड्यात आतिश कदम यांनी जिल्हा बँक संचालक ज्ञानदेव रांजणे यांच्यावर एकतर्फी टीका केली होती. त्यामुळे आंबेघर गणातील भाजप कार्यकर्ते चांगलेच भडकलेले पाहायला मिळाले. पत्रकार परिषदेतून त्यांनी सदस्य कदमांवर चांगलेच तोंडसुख घेतले. यावेळी जेष्ठ नेते रामभाऊ शेलार, मोहन कासुर्डे, बबन बेलोशे, केळघर सोसायटी चेअरमन नाना जांभळे,विजय सपकाळ, हरिभाऊ बेलोशे, बळवंत पाडळे गुरुजी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
रामभाऊ शेलार म्हणाले, वरोशी सोसायटीत साधे सभासद नसलेल्या आतिश कदमांनी प्रथम या सोसायटीचे सभासद होऊन दाखवावे. मग ठरावाच्या गप्पा माराव्यात. तर मोहन कासुर्डे म्हणाले, काळेश्वरी सोसायटीची बदनामी थांबवा. ही सोसायटी आमच्या नेतृत्वाखाली काम करते. आमच्या गावच्या सोसायटीची बदनामी आम्ही सहन करणार नाही. तुमच्यात धमकच होती तर ठराव करून दाखवायला हवा होता. तर नाना जांभळे म्हणाले, अतिष कदम तू जर आमच्या नेत्यांवर खालच्या भाषेत बोलशील तर आम्हीही आमची पातळी सोडून वागू, बोलू आम्हाला हे करण्यास भाग पाडू नकोस.
सदस्यांविरोधात रिट पिटीशन दाखल
कुसूंबी गटातून जे काही सदस्य निवडून आलेले आहेत. त्यांच्या विरोधात आम्ही निकालानंतर रिटपिटीशन दाखल केलेले आहे. त्यामुळे त्यांचे सदस्यत्व काही दिवसांचेच आहे. कदमांनी लय फडफड करू नये, असा दम बळवंत पाडळे यांनी भर पत्रकार परिषदेत भरला.
अंतिम मतदार यादीकडे लक्ष
जिल्ह्याच्या सहकाराची अर्थवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहेत. २०२६ ते २०३१ या कालावधीसाठी होणाऱ्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रारूप मतदारयादी आज प्रसिद्ध झाल्याने सहकार क्षेत्रातील राजकीय हालचालींना आता वेग येण्याची चिन्हे आहेत. विशेषतः ११ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होणाऱ्या अंतिम मतदार यादीकडे संभाव्य उमेदवारांसह जिल्ह्यातील प्रमुख राजकीय गटांचे लक्ष लागले आहे.