
या लोकदरबारावर “पूर्वनियोजित राजकीय कट” असल्याचा आरोप करत आमदार नरेंद्र मेहता यांनी त्याला जोरदार प्रत्युत्तर देण्याची भूमिका घेतली. त्याचाच भाग म्हणून भाजपकडून 22 एप्रिल रोजी भाईंदर पश्चिम येथील जिल्हा कार्यालयात ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात आला आहे. सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणाऱ्या या दरबारात नागरिकांना थेट उपस्थित राहून त्यांच्या समस्या मांडता येणार आहेत.
प्रशासकीय यंत्रणा प्रथमच थेट सहभागी
या जनता दरबाराचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे यावेळी विविध विभागांचे प्रशासकीय अधिकारी प्रत्यक्ष उपस्थित राहणार आहेत. महापालिका, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य, वीज, महसूल आदी विभागांतील अधिकारी नागरिकांच्या तक्रारी थेट ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. यामुळे नागरिकांना त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी वेगवेगळ्या कार्यालयांचे उंबरठे झिजवावे लागणार नाहीत, असा दावा भाजपकडून करण्यात येत आहे.
मेहता यांचा नियमित दरबार, पण यावेळी वेगळा अंदाज
नरेंद्र मेहता हे यापूर्वीही दर मंगळवारी आपल्या कार्यालयात ‘जनता दरबार’ घेऊन नागरिकांच्या समस्या ऐकत आले आहेत. मात्र त्या वेळी प्रशासकीय अधिकाऱ्यांची उपस्थिती नसल्याने तक्रारींच्या निवारणाला वेळ लागत असल्याची टीका होत होती. यावेळी अधिकाऱ्यांच्या सहभागामुळे हा दरबार अधिक प्रभावी आणि परिणामकारक ठरेल, असा विश्वास त्यांच्या समर्थकांकडून व्यक्त केला जात आहे.सरनाईकांच्या लोकदरबारातील तक्रारींवरून वाददरम्यान, सरनाईक यांनी घेतलेल्या लोकदरबारात मेहता यांच्या विरोधात आलेल्या तक्रारींमुळे शहरात मोठा संभ्रम निर्माण झाला. या तक्रारी राजकीय हेतूने उभ्या करण्यात आल्याचा आरोप करत मेहता यांनी सरनाईक यांच्यावर थेट निशाणा साधला होता. “आपली प्रतिमा मलिन करण्यासाठी हा कट रचला गेला,” असा आरोप करत त्यांनी या सर्व आरोपांना फेटाळले.
त्याचवेळी, “शहरात सरनाईक यांच्याविरोधातही अनेक तक्रारी आहेत आणि त्या योग्य वेळी जनता दरबारातून समोर आणल्या जातील,” असा इशाराही मेहता यांनी दिला होता. त्यामुळे आता भाजपच्या या दरबारातून कोणते मुद्दे उघडकीस येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. कार्यकर्त्यांमध्ये वाढता संघर्ष, युतीवर परिणाममेहता-सरनाईक वादाचा परिणाम आता दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्येही स्पष्टपणे दिसून येत आहे. सोशल मीडियावर आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू असून, काही ठिकाणी कार्यकर्त्यांमध्ये वादाचे प्रसंगही घडल्याची चर्चा आहे. या वाढत्या तणावामुळे शिवसेना-भाजप युतीतील समन्वयावरही परिणाम होत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
वरिष्ठ पातळीवरील नेत्यांसाठी ही परिस्थिती डोकेदुखी ठरत असून, स्थानिक पातळीवरील वाद नियंत्रित ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांच्या समोर आहे. आगामी महापालिका निवडणुका डोळ्यासमोर ठेवता या संघर्षाचा राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.जनता दरबार की शक्तीप्रदर्शन?भाजपकडून आयोजित करण्यात आलेला हा जनता दरबार केवळ नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आहे की तो शिवसेनेला राजकीय प्रत्युत्तर देण्यासाठीचे शक्तीप्रदर्शन आहे, याबाबतही चर्चा रंगल्या आहेत. मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती, अधिकाऱ्यांचा सहभाग आणि संभाव्य तक्रारींचा पाऊस यामुळे हा दरबार राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा ठरणार आहे.
नजर 22 एप्रिलकडेएकूणच, ‘लोकदरबार विरुद्ध जनता दरबार’ असा थेट संघर्ष मिरा-भाईंदरच्या राजकारणात रंगत असून, 22 एप्रिल रोजी होणारा हा कार्यक्रम वादाला आणखी पेटवणार की काही प्रमाणात तो शांत करणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. नागरिकांच्या समस्या खऱ्या अर्थाने मार्गी लागतात की राजकारणाचा रंग अधिक गडद होतो, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.