
हे वर्ष कमी पावसाचे व पाणी जपून वापरण्याचे
आढी वाचनातून व्यक्त केला गेला अंदाज
पिंगोरी मध्ये करण्यात आले आढी वाचन आणि पंचाग पूजन
नीरा: हिंदू नववर्षाच्या प्रारंभी सर्वत्र पंचांग पूजनाची परंपरा पाळली जाते. याच अनुषंगाने पुरंदर तालुक्यातील शिंदे सरदारांचे गाव म्हणून ओळख असलेल्या पिंगोरी येथे पारंपरिक आढी वाचन व पंचांग पूजन मोठ्या उत्साहात पार पडले. या आढी वाचनातून यंदा पावसाचे प्रमाण कमी राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून नागरिकांना पाणी जपून वापरण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
पिंगोरी येथे शेकडो वर्षांपासून आढी वाचनाच्या माध्यमातून पर्जन्यमान व पीक परिस्थितीचा अंदाज बांधण्याची परंपरा जपली जाते. यावर्षीच्या आढी वाचनानुसार निम्म्याहून अधिक नक्षत्रे कोरडी जाणार असून काही मोजक्याच नक्षत्रांत समाधानकारक पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा पाऊस अन्नधान्य पिकांसाठी पुरेसा ठरणार असला तरी एकूणच पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो, असा अंदाज व्यक्त करण्यात आला.
या अंदाजानुसार बाजरी व ज्वारीचे उत्पादन बऱ्यापैकी होण्याची शक्यता असून धान्य पिकांना अनुकूल परिस्थिती राहील. मात्र कडधान्य पिकांचे उत्पादन कमी राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पिंगोरी हे गाव छत्रपती शिवाजी महाराजांच्या सरदार भिलोजी शिंदे यांच्याशी संबंधित असून येथे शिवपूर्व काळापासून पिंगळाई देवीची पूजा केली जाते. सध्या ही देवी वाघेश्वरी देवी म्हणून ओळखली जाते. चैत्र पाडव्याच्या दिवशी या मंदिरात पंचांग वाचन केले जाते. त्याचबरोबर महादेव मंदिरासमोर आढी पूजन व वाचन करून वर्षभरातील पर्जन्यमान व पिकांचा अंदाज मांडला जातो.
आज गुरुवारी सकाळी ग्रामस्थांच्या उपस्थितीत आढी पूजन करण्यात आले. यावेळी पिंगोरीचे सरपंच संदीप यादव, पोलिस पाटील राहुल शिंदे, धनंजय शिंदे, सुरेश शिंदे, पोपट शिंदे, वसंत शिंदे, सुनील शिंदे, शशिकांत चौधरी, निलेश शिंदे, गोविंद शिंदे, राजेंद्र शिंदे, बाळासाहेब गायकवाड, मंगेश शिंदे, माणिक गायकवाड, कैलास गायकवाड, प्रवीण शिंदे, सागर सुतार, तुकाराम शिंदे, मच्छिंद्र शिंदे, शांताराम शिंदे आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.