
७० वर्षांतील सर्वात शक्तिशाली नैसर्गिक संकट
नवी दिल्ली : वर्षअखेरीस भारतासह उत्तर गोलार्धातील अनेक देशांसमोर सुपर अल नीनोचे संकट उभे राहण्याची शक्यता आहे. प्रशांत महासागरात अत्यंत शक्तिशाली अल नीनो विकसित होत असून, हा १९५० नंतरचा सर्वात तीव्र अल नीनो ठरू शकतो, असा दावा अमेरिकेची राष्ट्रीय महासागर व वातावरणीय प्रशासन संस्था (एनओएए) च्या अहवालात करण्यात आल्याचे वृत्त आहे.
सप्टेंबरपासून त्याचा प्रभाव जाणवण्यास सुरुवात होऊन वर्षअखेरीस त्याची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. प्रशांत महासागराच्या पृष्ठभागावरील समुद्राचे पाणी नेहमीपेक्षा असामान्यरीत्या गरम होण्याच्या प्रक्रियेला अल नीनो म्हणतात. सामान्य परिस्थितीत वारे उबदार पाणी आशियाच्या दिशेने ढकलतात. मात्र, हे वारे कमकुवत झाल्यास उबदार पाणी मध्य आणि पूर्व प्रशांत महासागराच्या दिशेने सरकते. परिणामी, जगभरातील वातावरणीय परिसंचरणावर परिणाम होऊन विविध देशांमध्ये पाऊस, तापमान आणि हवामानाच्या पद्धतीत बदल होतात.
दरम्यान, सुपर अल नीनोच्या संभाव्य प्रभावाच्या वेळेमुळे भारताला काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सामान्यतः अल नीनोचा हिंद महासागर आणि भारताच्या आसपासच्या भागांवर परिणाम दिसून येण्यासाठी सुमारे ४० ते ४५ दिवसांचा विलंब होतो. त्यामुळे अल नीनोचा प्रभाव अधिक स्पष्ट होईपर्यंत भारतातील मान्सून अंतिम टप्प्यात पोहोचलेला असण्याची शक्यता आहे. याशिवाय, इंडियन ओशन डायपोल प्रणाली अल नीनोचा प्रभाव काही प्रमाणात कमी करू शकते.
हिवाळ्यात प्रभाव वाढण्याची भीती
यंदाचा अल नीनो अत्यंत शक्तिशाली होण्याची शक्यता सुमारे ७० टक्के आहे. तसेच उत्तर गोलार्धातील हिवाळ्यात अल नीनोची स्थिती अत्यंत मजबूत राहण्याची शक्यता सुमारे ९० टक्के असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे भारतातील हवामानाच्या स्थितीत मोठे बदल होण्याची शक्यता असून, काही भागांत पावसाचे प्रमाण घटल्यास दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण होऊ शकते.
महाराष्ट्रात मान्सूनचे ‘कमबॅक’
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. काही काळाच्या विश्रांतीनंतर, महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय होण्याची चिन्हे दिसत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवसांत मुंबईसह कोकण, विदर्भ, खानदेश आणि मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.