
फोटो सौजन्य - Social Media
द्रौपदी मुर्मू यांच्या शेगाव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण शहरात अभूतपूर्व सुरक्षा व्यवस्था उभारण्यात आली आहे. चार दिवसीय राष्ट्रीय आरोग्य मेळाव्याचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन आयुष मंत्रालय आणि अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे. उद्घाटन सोहळा संत गजानन महाराज संस्थानच्या विसावा मैदानावर पार पडणार आहे. दौऱ्यादरम्यान राष्ट्रपती मंदिरात जाऊन श्री संत गजानन महाराजांच्या समाधीचे दर्शन घेणार आहेत.
या कार्यक्रमाला राज्यातील आणि केंद्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आचार्य देवव्रत, देवेंद्र फडणवीस तसेच एकनाथ शिंदे यांच्यासह विविध क्षेत्रांतील प्रमुख व्यक्ती या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. त्यामुळे प्रशासनाकडून सर्व स्तरांवर काटेकोर नियोजन करण्यात आले आहे. राष्ट्रपतींच्या भेटीच्या पार्श्वभूमीवर शेगाव शहराला अक्षरशः छावणीचे स्वरूप आले आहे. सुमारे ३० जिल्ह्यांमधून पोलिस पथके बोलावण्यात आली असून ३२ श्वान पथके आणि तीन हजारांहून अधिक पोलिस अधिकारी तैनात करण्यात आले आहेत. याशिवाय स्थानिक गुन्हे शाखा, दहशतवादविरोधी पथक आणि बॉम्बशोधक पथक यांचीही स्वतंत्र नियुक्ती करण्यात आली आहे. हेलिपॅडपासून मंदिर परिसर आणि विसावा मैदानापर्यंत बहुस्तरीय सुरक्षा वर्तुळ तयार करण्यात आले आहे.
शहरातील सर्व प्रवेशद्वार, प्रमुख चौक, बसस्थानके आणि रेल्वे स्थानकांवर कडेकोट तपासणी सुरू आहे. प्रत्येक वाहनाची बारकाईने तपासणी केली जात असून संशयास्पद हालचालींवर विशेष लक्ष ठेवले जात आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून २४ तास देखरेख ठेवली जात असून वरिष्ठ अधिकारी स्वतः मैदानात उतरून सुरक्षा व्यवस्थेची पाहणी करत आहेत.
दरम्यान, भाविकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेत सकाळी ७.३० ते दुपारी १२.३० या वेळेत मंदिरातील दर्शन सर्वसामान्यांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. मंदिर परिसरात त्रिस्तरीय सुरक्षा व्यवस्था लागू करण्यात आली असून प्रशासनाकडून कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी सर्वतोपरी खबरदारी घेतली जात आहे. या दौऱ्यामुळे शेगाव शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये अभिमानाची भावना दिसून येत आहे. राष्ट्रपतींच्या उपस्थितीत होणारा राष्ट्रीय आरोग्य मेळावा हा स्थानिक तसेच राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरणार आहे.