
Buldhana farmers Kharif crop damage
जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय आहे. शेती हा व्यवसाय पूर्णतः निसर्गाच्या भरवशावर अवलंबून असल्याने शेतकऱ्यांना कधी चांगले दिवस बघायला मिळतात तर कधी निसर्गाचा प्रकल्पामुळे संकटाचा देखील सामना करावा लागतो. यंदाचा खरीप हंगाम देखील जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी संकट घेऊन आलेला आहे. अगोदरच मान्सूनच्या पावसाचे दोन आठवड्यानंतर झालेले आगमन, खरीप पेरणीला झालेला विलंब, त्यातच गत दीड महिन्यापासून दडी मारून बसलेला पाऊस. सोबतच किडींचा वाढता प्रादुर्भाव शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. पाऊस येईना, किडीचा प्रादुर्भाव थांबता थांबेना, हेच संकट जणू काही कमी झाले की काय? असे वाटत असतानाच कोवळ्या पिकात रोही, नीलगाय, हरीण आणि माकड या प्राण्यांचा होत असलेला मुक्त संचार कोवळ्या पिकांची नासाडी करीत आहे.
शेतकरी राबराब राबून शेतमाल पिकवतो. एकीकडे बाजारातही योग्य भाव मिळत नाही. तर दुसरीकडे वन्यप्राणी पिकांचे अतोनात नुकसान करतात. पीक नुकसानभरपाई मिळण्यासाठी वनविभागाकडे अर्ज केल्यानंतर कागदांचा ससेमिरा मागे लावला जातो. तरीदेखील तूटपुंजी मदत देऊन वनविभाग शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसतो, अशी संतप्त प्रतिक्रिया पांगरी उबरहंडे येथील शेतकरी गणेश देशमुख यांनी व्यक्त केली.
मेरा खुर्दचे शेतकरी, रामदास मुजुमले म्हणाले की, ८८ दोन ते तीन वर्षापासून शेतीतून पाहिजे तितके उत्पन्न होऊन राहिले नाही. जे काही उत्पन्न होते त्याला बाजारात भाव मिळत नाही. त्यामुळे दरवर्षीच कर्ज काढून शेतीची पेरणी करावी लागते. कधी निसर्ग साथ देतो तर कधी हिरावून घेतो. पीक पाणी चांगले आले तर शेत शिवारात रोह्यांचे कळप धुडगूस घालत असल्याने पिकांचे नुकसान होते. शेतशिवारात येणाऱ्या या वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त केला पाहिजे.