मुंबई – ब्रह्मगव्हाण उपसा सिंचन प्रकल्पाशी माझा काही संबंध नाही, असे म्हणत रोजगार फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. तसेच गोमुत्राने रस्ते साफ करण्यापेक्षा खैरेंचे डोके साफ करावे लागणार आहे, असे म्हणत त्यांनी चंद्रकांत खैरेंवर जोरदार निशाणा साधला आहे.
आरोपांवर बोलताना संदीपान भुमरे म्हणाले की, माझ्यावर लावण्यात आलेले आरोप साफ खोटे आहेत. अजून कुठलेही टेंडर झालेले नाही. माझे जावई असले तरी त्यांचे जुने रजिस्ट्रेशन आहे. ते माझ्या मुलीशी लग्न होण्याच्या आधीपासून कॉन्ट्रॅक्टर आहेत. माझा याच्याशी काही एक संबंध नाही. टेंडर हे ऑनलाइन असते. मी ते देऊ शकत नाही. यावर आता मी बोलणार नाही. पुरावे असतील तर दाखवावे, असे आव्हानही त्यांनी दिले.
विरोधकांवर भुमरे यांनी यावेळी पलटवार केला आहे. ते म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भव्यदिव्य सभा झाल्यापासून त्यांना भुमरेच दिसत आहेत. सभेच्या आधी माझ्यावर पैसे वाटल्याचे, चहा-नाश्ता ठेवला असे आरोप ठेवण्यात आले होते. हे काय आरोप आहेत का? असा सवाल त्यांनी विचारला.