
बदलापूर कर्जत मार्गावर दोन नवीन मार्गिका आणि फाटक असलेली ठिकाणी उड्डाणपुल बांधले जाणार आहेत.त्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनीचे अधिग्रहण करण्यासाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे.नवीन रेल्वे मार्गिका आणि उड्डाणपुलामुळे बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या पेक्षा जास्त मोबदला मिळावा आणि त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला रेल्वे सेवेत कायमस्वरूपी नोकरी मिळावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते महेश भगत यांनी मावळचे खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. कर्जत ते शेलू दरम्यान असलेली रेल्वे फाटक बंद करून त्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याच्या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.या प्रकल्पासाठी शेतकऱ्यांची संपादित होणारी जमीन बागायती आणि सुपीक असून अनेक कुटुंबांचा उदरनिर्वाह याच जमिनीवर अवलंबून आहे.
जमीन संपादित झाल्यामुळे हे शेतकरी भूमिहीन होणार असून त्यांच्या शाश्वत भविष्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. महेश भगत आणि शिवाजी कराळे यांनी खासदार बारणे यांच्याकडे पाचपट मोबदला देण्याची मागणी केली आहे.खासदार बारणे यांची आंबिवली गावातील शेतकऱ्यांनी पुणे येथील कार्यालयात जाऊन भेट घेतली आणि मागणी केली आहे. खासदार श्रीरंग आप्पा बारणे यांनी या प्रकरणी वैयक्तिक लक्ष घालून रेल्वे मंत्री आणि संबंधित रेल्वे बोर्डाकडे ही मागणी लावून धरली जाईल असे आश्वासन दिले.लवकरच मध्य रेल्वे महाव्यवस्थापक यांना नेरळ आणि कर्जत येथे सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी करण्यासाठी निमंत्रित केले आहे.त्यांच्याकडून या भागाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात येईल आणि ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बाधित होणाऱ्या जमिनीचा जास्तीत जास्त मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे आश्वासन खासदार बारणे यांनी दिले.
महेश भगत, शेतकरी
कर्जतच्या रेल्वे फाटक प्रश्नावर होणाऱ्या उड्डाणपुलाच्या निर्णयाचे स्वागतच आहे.हा विकास साधत असताना ज्या शेतकऱ्यांनी आपल्या सुपीक जमिनी अथवा घरे जाणार आहेत,त्यांच्या भविष्याची काळजी सरकारने घ्यावी अशी आमची मागणी आहे.