
Chandrapur News: अग्निवीर भरतीसाठी बल्लारपूर सज्ज; तीन राज्यांतील उमेदवारांची गर्दी, प्रशासनाकडून जय्यत तयारी
जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी भरतीच्या तयारी संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी डॉ. व्यवहारे यांनी संबंधित विभागांना विविध जबाबदाऱ्या सोपवून कामे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महानगरपालिका, सार्वजनिक बांधकाम, विद्युत विभाग, पोलिस आणि राज्य परिवहन विभागाच्या अधिकाऱ्यांनी क्रीडा संकुलाची संयुक्त पाहणी करून आवश्यक कामांचे नियोजन करावे. सार्वजनिक बांधकाम विभागाने दुरुस्ती व विद्युतीकरणाची कामे तातडीने पूर्ण करावीत, असे निर्देश देण्यात आले. (फोटो सौजन्य – AI Created)
उमेद व माविमच्या बचत गटांच्या माध्यमातून स्टेडियमबाहेरील जागेत उमेदवारांसाठी सशुल्क खाद्यपदार्थ व आवश्यक वस्तूंचे स्टॉल उपलब्ध करून देण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेला देण्यात आली. पोलिस विभागाने कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच उमेदवारांच्या गर्दीचे नियोजन करण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ तैनात करावे, असे सांगण्यात आले.
क्रीडा संकुल परिसरातील गवत व झुडपे हटवून स्वच्छता राखणे, पुरेशा स्वच्छतागृहांची व्यवस्था करणे, उमेदवारांच्या ने-आणीसाठी बसेस उपलब्ध करून देणे तसेच भरतीच्या काळात अखंड वीजपुरवठा सुनिश्चित करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या. बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कल्पना क्षीरसागर, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बंडू रामटेके, बल्लारपूरचे उपविभागीय अधिकारी डॉ. अर्जुन पावरा, तहसीलदार रेणुका कोकाटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
अग्निवीर भरतीदरम्यान उमेदवारांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी रुग्णवाहिका, प्रथमोपचार साहित्य आणि डॉक्टरांचे पथक सज्ज ठेवण्यात येणार आहे. कागदपत्रांची पडताळणी सुरळीत पार पडावी यासाठी शिक्षण विभागाकडून किमान दहा शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे. तसेच क्रीडा संकुल परिसरात साप अथवा इतर वन्यप्राण्यांमुळे उमेदवारांना धोका निर्माण होऊ नये, यासाठी वनविभागाचे आवश्यक मनुष्यबळ तैनात ठेवण्याचे निर्देश अपर जिल्हाधिकारी डॉ. व्यवहारे यांनी दिले आहेत.