
Raigad News: महाडमध्ये प्रथमच जिल्हा परिषदेचा भव्य शैक्षणिक सोहळा; १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ गुणवंत विद्यार्थ्यांचा होणार गौरव
या कार्यक्रमात जिल्ह्यातील १६ आदर्श शिक्षकांसह ३२२ शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात येणार आहे. आगामी काळात जिल्हा परिषदेला विविध उपक्रमांसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांचाही सन्मान करण्यात येणार असल्याचे कळंबे यांनी सांगितले. जिल्ह्यातील शिक्षकांच्या रिक्त पदांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी येत्या काही दिवसांत ३५० पेक्षा अधिक शिक्षकांचे समायोजन करण्यात येणार आहे. (फोटो सौजन्य – AI Created)
दक्षिण रायगडातील रिक्त पदांना यामध्ये प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. महाडमधील रिक्त असलेल्या १२५ पदांपैकी जवळपास १०० पदे समायोजन प्रक्रियेतून भरली जातील, अशी माहितीही त्यांनी दिली. रायगड भूषण पुरस्कार पुन्हा सुरू करू ! याच अनुषंगाने १२ सप्टेंबर रोजी जिल्ह्यातील सुमारे १२०० भजनी मंडळांना भजन साहित्याचे वाटप महाडमध्ये करण्यात येणार आहे. बंद असलेला रायगड भूषण पुरस्कार पुन्हा सुरू करून त्याचा कार्यक्रम महाडमध्ये घेण्याबाबत विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
शाळांच्या वीज बिलांबाबत बोलताना कळंबे यांनी सांगितले की, जिल्ह्यातील शाळांना सध्या व्यावसायिक दराने वीज बिले आकारली जात आहेत. याबाबत शासनाशी चर्चा सुरू असून जिल्ह्यातील १०० पेक्षा अधिक शाळांमध्ये सौरऊर्जा व्यवस्था उभारण्याला प्राधान्य देण्याचा विचार आहे. महाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दालनात झालेल्या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद सदस्य निलेश ताटरे, स्थानिक प्रभारी गटशिक्षणाधिकारी राजन सुर्वे, प्राथमिक शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, अधिकारी उपस्थित होते.
रायगड जिल्हा परिषदेच्या अनेक कार्यक्रमांचे आयोजन आतापर्यंत अलिबाग, पेण आणि पनवेल परिसरात प्रामुख्याने होत होते. मात्र, पालकमंत्री भरत गोगावले यांनी जबाबदारी स्वीकारल्यानंतर जिल्ह्यातील महत्त्वाचे कार्यक्रम दक्षिण रायगडात, विशेषतः ऐतिहासिक महाडमध्येही आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.- चंद्रकांत कळंबे, शिक्षण सभापती, राजिप
मैदानी स्पर्धादरम्यान विद्याथ्यर्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न तसेच होणाऱ्या अपघातांबाबत आगामी काळात उपाययोजनांचा विचार केला जाईल. बंद झालेला क्रीडा निधी पुन्हा सुरू करण्याबाबतही शासनस्तरावर विचार केला जाईल, असे कळंबे यांनी पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शालेय पोषण आहाराच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. धान्यपुरवठ्यात अयोग्य प्रकार आढळल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द केला जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.