
Chandrapur News: 25 दिवसांचा मुक्काम संपला, हत्तींचा कळप गडचिरोलीकडे परतला; परतीच्या वाटेवर शेतांचे नुकसान, एकाचा बळी
३० मे रोजी रात्रीच्या सुमारास बोरमाळा घाटावरून ३० ते ३२ जंगली हत्तींच्या कळपाने गडचिरोली जिल्ह्यातून चंद्रपूर जिल्ह्यात प्रवेश केला. दरम्यान सावली तालुक्यातील बोरमाळा, पाथरी परिसरात हत्तींनी काही दिवस भ्रमंती केली. त्यांनतर सावली शहराजवळ प्रवेश करीत सीर्सी, लोंढोली, साखरी मार्गे चामोर्शीकडे रवाना झाले. मात्र दुसऱ्याच दिवशी चामोर्शीकडून हत्तींनी पावले परत फिरवत उमरी परिसरातील जंगलात हत्तींनी बस्तान मांडले. ४ जून ते बुधवारपर्यंत हत्तींचा मुक्काम सावली तालुक्यातील उमरी परिसरात असलेल्या जंगलात होता. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे शेतामध्ये नागरिकांची वर्दळ नव्हती, मात्र मागील ८ दिवसापासून पाऊस पडत असल्याने, शेतीकामांना वेग आला.
दरम्यान अनेकांनी पऱ्हे व आवत्या टाकले. २५ दिवसांपासून थांबलेल्या हत्तींच्या कळपाने बुधवारी रात्री मात्र आपला मार्ग उपरी, कापसी, सामदामार्गे नदीपल्याड हलविला. त्यावेळी पेरणी करण्यात आलेल्या धानपिकांचे नुकसान झाले. हत्तींचा कळप सोनापूरवरून नदीच्या पलीकडे गडचिरोली जिल्ह्यात गेला. मात्र त्या कळपातील एक जंगली हत्ती कळपापासून भरकटला गेल्याने तो सोनापूर परिसरात फिरत होता.
गुरूवारी रात्री व्याहाडवरून सोनापूरकडे निघालेल्या तीन जणांच्या दृष्टीस तो जंगली हत्ती पडला. दरम्यान दुचाकीस्वार असलेल्या तिघांनीही पळ काढला. यात गोहणे (रा. सोनापूर) यांचा हत्तीच्च्या हल्ल्यात मृत्यू झाला. गेल्या २५ दिवसांपासून हत्तींच्या संरक्षणासाठी वनविभागाचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते. हत्तींनी गावात प्रवेश करू नये म्हणून वनविभागाकडून वेळोवेळी सूचना दिल्या जात होत्या. मात्र हत्तींच्या परतीच्या प्रवासाने शेतपिकांचे नुकसान केले. शिवाय एका व्यक्तीचा बळी घेतल्याची खंत नागरिक व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी दैनिक नवराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.
हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या गोहणे यांच्या कुटुंबियांना वनविभागाकडून ५० हजार रूपयांची तत्काळ मदत देण्यात आली. उर्वरीत रक्कम लवकरच देण्यात येणार आहे. ज्यांच्या धानपिकांचे नुकसान झाले त्यांनी वनविभागाकडे अर्ज द्यावे. पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात येणार, असेही वनविभागाने सांगितले. हत्तीनी गडचिरोली जिल्ह्यात प्रवेश केला असला तरी परतण्याची भीती कायम असल्यामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगावी व वनविभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे. – राजन तलमले, विभागीय वन अधिकारी, चंद्रपूर