
Chandrapur News: अडीच महिने उलटले, तरी करार रखडला; चंद्रपुरातील शाळांमध्ये पोषण आहारासाठी शिक्षकांची उधारी
जिल्हा परिषद, महानगरपालिका तसेच नगर परिषद क्षेत्रातील शासकीय, खासगी, अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहार योजना राबविण्यात येते. विद्यार्थ्यांना शाळेतच सकस आहार मिळावा, त्यांची उपस्थिती वाढावी आणि कुपोषणाला आळा बसावा, हा या योजनेमागील प्रमुख उद्देश आहे. मात्र, अन्नधान्याच्या पुरवठ्यात निर्माण झालेल्या अडथळ्यामुळे योजनेच्या अंमलबजावणीवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मध्यान्ह भोजनासाठी आवश्यक असलेले तांदूळ, कडधान्य व अन्य अन्नधान्य राज्यस्तरावरून पुरविले जाते. त्यासाठी दरवर्षी निविदा प्रक्रिया राबवून संबंधित पुरवठादाराची नियुक्ती केली जाते आणि त्याच्याशी वर्षभराचा करारनामा केला जातो. (फोटो सौजन्य – AI Created)
मागील वर्षीच्या पुरवठादाराचा करार नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वीच संपुष्टात आला. त्यामुळे नवीन शैक्षणिक सत्र सुरू होण्यापूर्वीच नवीन करारनामा होऊन शाळांना पुरेसा अन्नधान्यसाठा उपलब्ध होणे अपेक्षित होते. मात्र, शैक्षणिक सत्र सुरू होऊन अडीच महिने उलटले तरी करारनाम्याची प्रक्रिया लांबली. परिणामी मागील वर्षी शाळांना उपलब्ध करून देण्यात आलेला राखीव साठाच वापरावा लागला. मोठ्या पटसंख्येच्या शाळांमध्ये हा साठा लवकर संपला, तर तुलनेने कमी पटसंख्या असलेल्या शाळांमधील अन्नधान्यही आता संपुष्टात येऊ लागले आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या दीड हजारांहून अधिक प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत. याशिवाय खासगी, अनुदानित आणि इतर शाळांची संख्या दोन हजारांहून अधिक आहे. या सर्व शाळांमधील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहाराचा लाभ मिळतो.
अन्नधान्याचा साठा संपल्याने विद्यार्थ्यांचे भोजन बंद पडू नये, यासाठी काही शाळांतील शिक्षकांनी स्थानिक किराणा दुकानदारांकडून उधारीवर तांदूळ, कडधान्य आणि अन्य साहित्य घेण्यास सुरुवात केली आहे. विद्यार्थ्यांना उपाशी ठेवण्यापेक्षा स्वतःच्या जबाबदारीवर व्यवस्था करण्याचा मार्ग शिक्षकांनी स्वीकारला आहे. मात्र, ही व्यवस्था किती दिवस चालणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. काही शाळांमध्ये शाळा व्यवस्थापन समित्यांच्या माध्यमातून तात्पुरता अन्नधान्य पुरवठा केला जात आहे. त्यामुळे एका शाळेत योजना सुरू असताना दुसऱ्या शाळेत अन्नधान्याची कमतरता, अशी विसंगत परिस्थिती निर्माण झाली आहे.
अकोल्यातील नागरिकांवर मोठं जलसंकट; काटेपूर्णात 5 वर्षांच्या तुलनेत निम्म्याहून कमी साठा
मध्यान्ह भोजन योजनेसाठी पुरवठा करण्यासंदर्भात राज्यस्तरावरून आता करारनामा झाला आहे. येत्या दोन-तीन दिवसांत जिल्ह्यातील सर्वच शाळांमध्ये शालेय पोषण आहाराचे साहित्य उपलब्ध होईल.- विशाल देशमुख, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), जिल्हा परिषद, चंद्रपूर
अनेक शाळांमधील अन्नधान्याचा साठा संपला आहे. त्यामुळे शिक्षक उधारीवर साहित्य घेऊन योजना सुरू ठेवत आहेत. मागील वर्षीचा साठाही आता संपला आहे. विद्यार्थ्यांना भोजन मिळावे म्हणून उधारीवर अन्नधान्य घेऊन गुजराण सुरू आहे. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन कायमस्वरूपी तोडगा काढावा.- हरीश ससनकर, राज्य सरचिटणीस, पुरोगामी प्राथमिक शिक्षक समिती