
छत्रपती संभाजीनगर पोलिसांच्या एका मोहिमेने १७ विखुरलेली कुटुंबे पुन्हा जोडली!
तांत्रिक विश्लेषण, सोशल मीडिया तपास, सीसीटीव्ही फुटेज, रेल्वे स्थानके, बसस्थानके, सार्वजनिक ठिकाणांवरील चौकशी तसेच विविध जिल्ह्यांतील पोलिसांशी समन्वय साधत प्रत्येक धाग्याचा पाठपुरावा करण्यात आला. या प्रयत्नांतून १७ बालकांचा शोध लागला. शोध लागलेल्या १७ बालकांपैकी ११ मुली प्रेमसंबंधांच्या प्रभावामुळे घरातून निघून गेल्याचे निष्पन्न झाले. दोन मुलींनी रागाच्या भरात घर सोडले होते. मोठे शहर पाहण्याच्या आकर्षणातून तीन मुले घराबाहेर पडली होती, तर आई वडिलांमधील सततच्या वादाला कंटाळून एका मुलाने घर सोडल्याचे तपासात समोर आले, पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांनी सांगितले की, घरातून गेलेले मूल पुन्हा आई-वडिलांच्या कुशीत परत आणणे हा पोलिसांसाठी आनंद असतो.
चिकलठाणा परिसरातील १७ वर्षीय मुलगी सोशल मीडियाच्या विशेषतः इंस्टाग्राम सक्रिय होती. आणि घरातील शिस्तीबाबत नाराज होऊन घरातून निघून गेली होती. तिच्या सोशल मीडिया खात्यांचा बारकाईने तपास करत पोलिसांनी संपर्कातील व्यक्तींची चौकशी केली. त्यातून ती पुण्यातील एका मैत्रिणीकडे असल्याचे समोर आले. समुपदेशनानंतर तिला कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आले.
संभाजीनगर पोलिस दलात मोठा फेरबदल, 12 नव्या अधिकाऱ्यांची एंट्री; 4 अधिकारी जिल्ह्याबाहेर
करमाड परिसरातील १४ वर्षीय मुलगा घरातील सततच्या वादामुळे मानसिकदृष्ट्या त्रस्त झाला होता. घर सोडल्यानंतर पोलिसांनी विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून अखेर त्याला मुकुंदवाडी रेल्वे स्थानक परिसरात शोधून काढले. मुलगा व पालकांचे समुपदेशन करून कुटुंब पुन्हा एकत्र आणण्यात आले.
शिऊर परिसरातील १५ ते १६ वर्षे वयोगटातील तीन मित्रांनी मुंबई पाहण्याच्या उत्सुकतेतून घर सोडले. रेल्वे मार्ग, स्थानके आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी त्यांचा माग काढत दादर रेल्वे स्थानक परिसरातून तिघांनाही ताब्यात घेतले. त्यानंतर त्यांना सुखरूप पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.
शिऊर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील १७ वर्षीय मुलगी अभ्यासाच्या कारणावरून आईसोबत झालेल्या वादानंतर घरातून निघून गेली होती. पोलिसांनी नातेवाईक व मित्रपरिवाराकडे चौकशी करत तिचा शोध घेतला. ती नातेवाईकांकडे सुरक्षित असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर समुपदेशन करून पालकांच्या स्वाधीन करण्यात आले.