
शासकीय योजना सर्वसामान्य रुग्णांपर्यंत पोहोचाव्यात, त्यांना विविध वैद्यकीय सुविधा, उपचार पद्धती आणि शासनाच्या उपक्रमांची माहिती मिळावी, यासाठी माहितीपत्रके आणि फलक असणे आवश्यक आहे. मात्र माहिती देण्याच्या नावाखाली सुरू असलेल्या या अनियंत्रित पोस्टरबाजीने रुग्णालयाचा मूळ उद्देशच हरवून बसल्याचे चित्र आहे. एका माहितीफलकावर दुसरा बॅनर, एका भिंतीवर तीन-तीन जाहिराती आणि मार्गदर्शक फलकांवरही प्रचाराचे साहित्य चिकटवण्यात आल्याने रुग्ण, नातेवाईक आणि प्रथमच रुग्णालयात येणाऱ्या नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे.
विशेष म्हणजे, ज्या काही योजना पीपीपी किंवा पीपीई तत्त्वावर खासगी कंत्राटदारांकडे चालविण्यासाठी देण्यात आल्या आहेत, त्या कंत्राटदारांनी रुग्णालय परिसराला जणू स्वतःची खासगी मालमत्ता समजून जागोजागी स्वतःच्या सेवांचे बॅनर लावले आहेत. काही ठिकाणी तर सरकारी माहितीपेक्षा खासगी संस्थांचे बॅनर अधिक ठळकपणे झळकत असल्याने हे जिल्हा रुग्णालय आहे की एखादे व्यावसायिक प्रदर्शन केंद्र, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
आरोग्य विभागाचे वरिष्ठ अधिकारी, जिल्हा शल्यचिकित्सक आणि संबंधित प्रशासनाने या प्रकाराची दखल घेऊन रुग्णालय परिसरातील अनधिकृत, अवाजवी आणि पुनरावृत्ती करणारे बॅनर हटवावेत, माहिती फलकांसाठी धोरण आखावे आणि सरकारी संस्थेची प्रतिष्ठा जपावी, अशी मागणी रुग्णांसह नागरिकांतून होत आहे. अन्यथा ‘रुग्णसेवेपेक्षा पोस्टरसेवा’ अशीच ओळख या रुग्णालयाची निर्माण होण्यास वेळ लागणार नसल्याचे बोलले जात आहे.
रुग्णालय परिसरात फलक लावण्यासाठी काही नियम नाहीत का ? असल्यास त्याची अंमलबजावणी का होत नाही? सार्वजनिक आरोग्य संस्थेचे सौंदर्य, शिस्त आणि माहिती व्यवस्थापन याकडे प्रशासनाने डोळेझाक का केली जातेय? कंत्राटदारांना एवढे मोकळे रान कोणी दिले? असे प्रश्न उपस्थित होत आहे.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे मानसिक संतुलन आणि स्वच्छ, सुटसुटीत वातावरण याला मोठे महत्त्व असते. मात्र येथे प्रवेश करताच भिंती, खांब, कॉरिडॉर आणि विभागांच्या प्रवेशद्वारांवर लटकणाऱ्या बॅनरच्या गर्दीमुळे गोंधळाचे वातावरण निर्माण होत आहे. प्रशासनाच्या देखरेखीअभावी कोणालाही कुठेही बॅनर लावण्याची मोकळीक मिळाल्याचे दिसत आहे.