
छत्रपती संभाजीनगर मनपाचे 'बजेट' अंतिम टप्प्यात! (Photo Credit- X)
३१ मार्चपूर्वी अर्थसंकल्प स्थायी समितीकडे सादर करणे आवश्यक आहे. समितीच्या चर्चेनंतर त्यात आवश्यक ते बदल करून तो सर्वसाधारण सभेसमोर मांडला जाणार आहे. या प्रक्रियेदरम्यान काही नव्या तरतुदींचा समावेश होऊन अर्थसंकल्पाचा आकार आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.
यंदा प्रत्येक प्रभागातून चार नगरसेवक निवडून आल्यामुळे विकासकामांच्या प्रस्तावांचा ओघ वाढणार आहे. रस्ते, पाणी, मलनिस्सारण, उद्याने यांसारख्या मूलभूत सुविधांसाठी मोठ्या प्रमाणात मागण्या येण्याची शक्यता आहे. परिणामी, गेल्या वर्षीच्या तुलनेत कामांसाठीची तरतूद लक्षणीय वाढू शकते.
गतवर्षी नावीन्यपूर्ण योजनांसाठी सुमारे १४८ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यंदाही अशाच प्रकारच्या उपक्रमांसाठी स्वतंत्र निधी राखीव ठेवण्याचे संकेत मिळत आहेत. स्मार्ट सिटीच्या धर्तीवर काही नवीन प्रकल्पांना प्राधान्य मिळण्याची शक्यता आहे.
महापालिकेचा यंदाचा अर्थसंकल्प आकाराने मोठा असला तरी त्यामागे प्रलंबित कामांचा वाढता बोजा, कर्जाची परतफेड आणि नव्या विकास प्रकल्पांची गरज या तिन्ही गोष्टी कारणीभूत आहेत. त्यामुळे एकीकडे शहराच्या विकासाला गती मिळणार असली, तरी दुसरीकडे आर्थिक शिस्त राखण्याचे आव्हान आहे.