
मात्र, इतका कालावधी उलटूनही प्रशासनाने कोणतीही ठोस पावले उचललेली नाहीत. टंचाई विभागाकडे प्रस्ताव पाठवूनही फाईल धुळ खात पडली असल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत. दरम्यान, ग्रामस्थांनी तातडीने टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी करत इशारा दिला आहे की, जर प्रशासनाने त्वरित दखल घेतली नाही, तर अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेविरोधात तीव्र आंदोलन छेडले जाईल. बोलठाणमधील ही पाणीटंचाई आता केवळ समस्या नसून, प्रशासनाच्या उदासीनतेचा जिवंत पुरावा ठरत आहे.
प्रशासन झोपेत आहे का?
ग्रामपंचायत सदस्य करीमा हारुण पठाण यांनी प्रशासनाच्या निष्क्रयतेवर तीव्र नाराजी व्यक्त करत, दरवर्षी उन्हाळ्यात हीच परिस्थिती निर्माण होते, तरीही अधिकाऱ्यांना कोणतीही तत्परता दिसत नाही. नागरिकांचे हाल पाहूनही प्रशासन झोपेतच आहे का? असा संतप्त सवाल उपस्थित केला.
एकीकडे पाण्यासाठी वणवण करावी लागतेय तर दुसरीकडे पैठणमध्ये पाणीटंचाईवर सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. यंदा चांगल्या पावसामुळे पैठण तालुक्यातील पाणी परिस्थितीत लक्षणीय सुधारणा झाल्याचे चित्र समोर आले आहे. एप्रिल महिना अर्धा उलटूनही तालुक्यात पाणीटंचाई जाणवत नसून, मागील काही वर्षांच्या तुलनेत परिस्थिती पूर्णपणे बदललेली दिसत आहे. विशेष म्हणजे, पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी मोठ्या प्रमाणात घटली असून प्रशासनालाही यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. साधारणतः दरवर्षी मार्च अखेरपासूनच अनेक गावांत टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याची वेळ येते. मात्र यंदा एप्रिल महिन्याच्या मध्यापर्यंतही अशी परिस्थिती निर्माण झालेली नाही. यावरून भूजल पातळी चांगली टिकून असल्याचे स्पष्ट होत आहे. विहिरी, बोअरवेल व पाणवठ्यांमध्ये अद्यापही पाणी उपलब्ध असल्याने नागरिकांना मोठा दिलासा मिळत आहे.
तालुक्यातील ग्रामीण भागातून पाणीटंचाईबाबत पंचायत समितीकडे आतापर्यंत केवळ तीनच प्रस्ताव दाखल झाले आहेत. यात रांजणगाव खुरी, अब्दुल्लापूर तांडा आणि आडूळ (खुर्द) या गावांचा समावेश आहे. हे प्रस्ताव सध्या विचाराधीन असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक राजेश कांबळे यांनी दिली.
मागील वर्षी याच काळात अनेक गावांकडून प्रस्तावांची संख्या मोठी होती, त्याच्या तुलनेत यंदाची संख्या अत्यंत कमी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, केंद्र व
राज्य सरकारच्या विविध पाणीपुरवठा योजनांचाही सकारात्मक परिणाम दिसून येत आहे. खासदार संदीपान भुमरे आणि आमदार विलास भुमरे यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या वॉटर ग्रीड योजना तसेच ‘हर घर नल जल’ योजना ग्रामीण भागात प्रभावीपणे पोहोचल्याने अनेक गावांमध्ये घराघरात नळाद्वारे पाणी उपलब्ध झाले आहे. त्यामुळे पारंपरिक जलस्रोतांवरील ताण कमी झाला असून टँकरची गरजही घटली आहे. याशिवाय, जलसंवर्धनाच्या कामांनाही यंदा चांगले फळ मिळाले आहे.
आवश्यकतेनुसार उपाययोजना
पुढील मे-जून महिन्यात तापमान वाढल्यास काही भागात पाण्याची टंचाई जाणवण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यकतेनुसार तातडीने उपाययोजना करण्यासाठी पंचायत समिती व संबंधित यंत्रणा सज्ज असल्याचे सांगण्यात येत आहे.पैठण तालुक्याची टँकरमुक्तीकडे वाटचाल एकूणच, चांगला पाऊस, प्रभावी योजना आणि जलसंवर्धन यांचा संगम झाल्याने यंदा पैठण तालुक्यात पाणीटंचाईवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण मिळवण्यात यश आले आहे. परिस्थिती अशीच राहिल्यास यावर्षी तालुका मोठ्या प्रमाणात ‘टँकरमुक्त’ राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे.