
मुख्य जलवाहिनी फुटल्याने मध्यवर्ती शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत (Photo Credit-X)
शहराच्या जलपुरवठा व्यवस्थेतील अडचणी पुन्हा एकदा समोर आल्या आहेत. गुरुवारी पहाटे सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास रेल्वे स्टेशन परिसरातून ज्युबली पार्ककडे जाणारी ७०० मिलिमीटर व्यासाची मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. जलवाहिनीतील प्रचंड दाबामुळे काही वेळातच रस्त्यावर पाण्याचे मोठे लोट वाहू लागले.
घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने तत्काळ रेल्वे स्टेशन गेटसमोरील व्हॉल्व्ह बंद करून पाणीपुरवठा थांबवला. मात्र या तांत्रिक विधाडाचा फटका शहराच्या मध्यवर्ती भागातील वितरण व्यवस्थेला बसला असून, संपूर्ण पुरवठा विस्कळीत झाला आहे.
दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले असून, ते युद्धपातळीवर सुरू असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तरीही या भागातील नियोजित पाणीपुरवठा एक दिवसाने पुढे ढकलण्यात आला आहे. परिणामी, ईद आणि गुढीपाडवा या सणांच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
महापालिकेने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले असले, तरी अचानक बदललेल्या वेळापत्रकामुळे विशेषतः गृहिणींचे हाल होत आहेत. सणासुदीच्या तयारीत पाण्याअभावी अनेक घरांमध्ये अडचणी निर्माण झाल्या आहेत.
बुढीलाईन, जुना बाजार, आसफिया कॉलनी, जयभीमनगर, घाटी परिसर या भागांमध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे विस्कळीत झाला असून, दुरुस्ती पूर्ण होईपर्यंत नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे. प्रशासनाकडून पर्यायी उपाययोजनांबाबत अद्याप स्पष्टता नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले आहे. जलवाहिनी दुरुस्ती पूर्ण झाल्यानंतरच नियमित पुरवठा सुरळीत होईल, असे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.