छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेला ३६० वर्षे; शौर्य सोहळ्यासाठी हजारो शिवप्रेमी आग्र्याकडे रवाना
आग्रा येथे १७ ऑगस्ट रोजी होणाऱ्या शौर्य सोहळ्यासाठी मुंबईहून रवाना झालेल्या शिवप्रेमींच्या तुकडीचे शुक्रवारी टिळकनगर रेल्वे स्थानकावर उत्साहात स्वागत करण्यात आले. यावेळी महासंघाच्या कार्यकर्त्यांनी शिवप्रेमींना शुभेच्छा देत त्यांना आग्रा दौऱ्यासाठी निरोप दिला. मुंबईहून रवाना झालेल्या तुकडीत अखिल भारतीय मराठा महासंघाचे अध्यक्ष दिलीप जगताव, धोंडू जाधव, अविनाश राणे यांच्यासह सुमारे २० पदाधिकारी आणि शिवप्रेमींचा समावेश आहे.
छत्रपती शिवाजी महाराज इ.स. १६६६ मध्ये औरंगजेबाच्या दरबारात आग्रा येथे गेले होते. आग्रा दरबारातील प्रसंगानंतर त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. मात्र, परिस्थितीचा चातुर्याने सामना करत १७ ऑगस्ट १६६६ रोजी शिवाजी महाराजांनी आग्र्यातील नजरकैदेतून सुटका करून घेतली. भारतीय इतिहासातील हा अत्यंत महत्त्वाचा आणि प्रेरणादायी प्रसंग मानला जातो.
या ऐतिहासिक घटनेच्या ३६०व्या वर्षपूर्तीनिमित्त आग्रा येथे १७ ऑगस्ट रोजी शौर्य सोहळा आयोजित करण्यात आला आहे. महाराष्ट्रासह देशातील विविध भागांतून शिवप्रेमी या सोहळ्यात सहभागी होणार आहेत. शिवाजी महाराजांच्या शौर्याची, धैर्याची आणि मुत्सद्देगिरीची आठवण जागवण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
यंदा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या स्थापनेला १२५ वर्षे पूर्ण होत आहेत. छत्रपती राजर्षी शाहू महाराज आणि सयाजीराव गायकवाड महाराज यांचा राजाश्रय लाभलेल्या या महासंघाच्या वतीने या निमित्ताने वर्षभर विविध कार्यक्रम आणि उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. महासंघाच्या १२५व्या वर्धापन वर्षासोबतच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्रा सुटकेच्या ३६०व्या वर्षपूर्तीचा योग जुळून आल्याने यंदाच्या उपक्रमांना विशेष ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे.
या दोन ऐतिहासिक घटनांच्या औचित्याने अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने वर्षभर विविध कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. आग्रा येथील शौर्य सोहळा हा याच उपक्रमांचा महत्त्वाचा भाग आहे.
शिवप्रेमींच्या सहभागामुळे या सोहळ्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा आहे. महाराजांच्या आग्रा सुटकेच्या पराक्रमाची आठवण नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे.
शिवरायांच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाच्या प्रसंगाचे स्मरण करण्यासाठी महाराष्ट्रातून शिवप्रेमी मोठ्या संख्येने आग्र्याकडे रवाना होत आहेत. त्यामुळे १७ ऑगस्ट रोजी आग्रा येथे होणाऱ्या शौर्य सोहळ्याकडे शिवप्रेमींसह इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे.
अवघ्या 20 महिन्यांत छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला गळती; 2 कोटींच्या कामावर प्रश्नचिन्ह

