
मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचा खासगी कंपन्यांना कडक इशारा (Photo Credit- X)
उच्चस्तरीय बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले की, “सद्यस्थिती पाहता खासगी कंपन्यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ची (WFH) सवलत द्यावी. प्रवासादरम्यान कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला प्राधान्य देणे गरजेचे आहे. ज्या कंपन्या किंवा आस्थापना या शासकीय निर्देशांचे पालन करणार नाहीत, त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” तसेच, नागरिकांनी अत्यंत आवश्यक काम असल्याशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये, असे आग्रहाचे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
🕜 1.18pm | 6-7-2026📍Mumbai. LIVE | Media Interaction#Maharashtra #Mumbai https://t.co/SvLASJ3OuE — Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) July 6, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व जिल्हा प्रशासनांना आणि आपत्कालीन यंत्रणांना २४ बाय ७ अलर्ट मोडवर राहण्याचे आदेश दिले आहेत. गेल्या २४ तासांत राज्याच्या अनेक भागांत भूस्खलनाच्या दुर्दैवी घटना समोर आल्या आहेत. मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मोठ्या प्रमाणावर दरड कोसळून माती आणि मोठमोठे दगड मुख्य रस्त्यावर आले आहेत. या ठिकाणी ढिगारा उपसण्यासाठी आणि वाहतूक पूर्ववत करण्यासाठी संबंधित यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असून, वाहतूक कोंडी तातडीने सोडवण्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याच्या सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.
Mumbai Rain Alert: ‘मुसळधार पावसामुळे मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती…’ मंत्री लोढा काय म्हणाले?
मुंबई, पुणे, ठाणे आणि कोकणासह राज्यातील अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून मुंबई-पुणे दळणवळण ठप्प झाले आहे. याच गंभीर परिस्थितीचा दाखला देत, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा तथा खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दांत प्रहार केला आहे. पावसामुळे निर्माण झालेली अभूतपूर्व परिस्थिती आणि मोठे नुकसान पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात तातडीने ‘आणीबाणी’ जाहीर करावी, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
माध्यमांशी बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, राज्यात यापूर्वीही पाऊस झाला आहे आणि मुंबई-पुण्याला पाऊस नवा नाही. पण असं भयानक चित्र पूर्वी कधीच नव्हतं. हे कदाचित पहिल्यांदाच पाहायला मिळत असून अतिशय चिंताजनक आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी तातडीने संपूर्ण राज्याचा आढावा घेऊन राज्यात आणीबाणी जाहीर करावी. महाराष्ट्राचे नेमकं चित्र काय आहे? यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने भाष्य करणे आवश्यक आहे.