
मुंबईत मुसळधार पावसाला सुरुवात
मंत्री लोढा यांची आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा
मुंबई: गेल्या दोन-तीन दिवसांपासून मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील जनजीवन आणि परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, मुंबईकरांनी संकटसमयी प्रशासनाला केलेले सहकार्य अतिशय मोलाचे आहे, असे प्रतिपादन मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज केले. मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला प्रत्यक्ष भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
या प्रसंगी सभागृह नेता गणेश खणकर, महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे (IAS), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) प्राजक्ता वर्मा – लवंगारे (IAS), अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) अविनाश ढाकणे (IAS), उपायुक्त (आरोग्य) शरद उघडे आणि महानगरपालिकेचे संबंधित वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी परिस्थितीवर प्रकाश टाकताना सांगितले की, माननीय मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत नमूद केल्याप्रमाणे हा निसर्गाचा मोठा प्रकोप असून ही अभूतपूर्व परिस्थिती आहे. एकाच दिवसात शहरात ३५० पेक्षा जास्त झाडे उन्मळून पडल्याची घटना घडली. मात्र, अशा कठीण परिस्थितीतही महानगरपालिकेचे डिषास्टर डिपार्टमेंट आणि सरकारी यंत्रणा अत्यंत वेगाने आणि *युद्ध पातळीवर* रस्त्यांवरील झाडे हटवणे व पाण्याचा निचरा करण्याचे काम करत आहेत.
मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला आज भेट देऊन पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. मा. मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस जी यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सतर्क असून, नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत आवश्यक… pic.twitter.com/ymcHjvMgkw — Mangal Prabhat Lodha (@MPLodha) July 6, 2026
मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी खबरदारीचे उपाय
नागरिकांची, विशेषतः लांबच्या अंतरावरून प्रवास करणाऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून प्रशासनाने अत्यंत सतर्कतेने पावले उचलली आहेत. एक आवश्यक खबरदारीचा उपाय (Precautionary Measure) म्हणून सकाळी शाळा-कॉलेजेसना सुट्टी जाहीर करण्यात आली आणि त्यानंतर दुपारच्या सत्रात सरकारी कार्यालयांनाही सुट्टी देण्यात आली, जेणेकरून प्रवाशांना सुरक्षितपणे घरी पोहोचता येईल.
मुंबई थांबलेली नाही; जनजीवन सुरळीत
मंत्री लोढा यांनी अत्यंत सकारात्मकता व्यक्त करत सांगितले की, एवढ्या मोठ्या संकटानंतरही मुंबई कुठेही थांबलेली नाही. खबरदारीमुळे लोकल रेल्वेचा वेग काहीसा संथ असला तरी वाहतूक पूर्णपणे सुरू आहे. रस्त्यांवरील पाणी आणि झाडे पूर्णपणे साफ करून रस्ते वाहतुकीसाठी मोकळे करण्यात आले आहेत.
अहोरात्र झटणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक
“गेल्या तीन दिवसांपासून महानगरपालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दिवस-रात्र एक करून ऑन-फील्ड काम करत आहेत. संकटसमयी राजकारण न करता आपण सर्वांनी प्रशासनाच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे आणि त्यांच्या या अविरत परिश्रमांचे कौतुक (Appreciation) केले पाहिजे,” असे आवाहन मंत्री लोढा यांनी या वेळी केले. पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, ९० किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार सर्वांना व्हॉट्सॲपद्वारे सतर्कतेचे संदेश पाठवण्यात आले असून, पुढील कोणत्याही परिस्थितीचा सामना करण्यासाठी संपूर्ण प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे.