
फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा तालुक्यातील गुंज गावात काढण्यात आलेल्या मिरवणुकीदरम्यान डीजे वाजवण्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तीव्र वाद होऊन हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेत चार जण जखमी झाले असून साखरखेर्डा पोलिसांनी दोन्ही गटांतील एकूण १९ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. मिरवणूक सुरू असताना रात्री साडेआठच्या सुमारास हा प्रकार घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, गुंज येथे एका निवडणुकीनिमित्त मिरवणूक काढण्यात आली होती. वाजतगाजत सुरू असलेली ही मिरवणूक कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान सभापती अनिल तुपकर यांच्या घरासमोर आली असता वादाची ठिणगी पडली. तुपकर यांच्या घरात नुकतीच अँजिओप्लास्टी झालेला रुग्ण असल्याने त्यांनी मिरवणुकीतील डीजेचा आवाज कमी करून पुढे नेण्याची विनंती केली. मात्र, मिरवणुकीत सहभागी काही तरुणांनी ही विनंती नाकारत त्यांच्याशी वाद घातला.
सुरुवातीला झालेला शाब्दिक वाद काही वेळातच चिघळला आणि दोन्ही गट आमनेसामने आले. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर काठ्या आणि इतर वस्तूंनी एकमेकांवर हल्ला करण्यात आला. या हाणामारीत मुरहरी तुपकर यांना गंभीर दुखापत झाली, तर इतर तिघेही जखमी झाले आहेत. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
दरम्यान, या घटनेला जुन्या राजकीय वादाचीही किनार असल्याचे समोर येत आहे. काही जणांनी पूर्वीचे मतभेद उकरून काढत अनिल तुपकर आणि त्यांच्या कुटुंबीयांवर हल्ला केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या प्रकरणी अनिल तुपकर यांच्या फिर्यादीवरून अमोल तुपकर, सुरेश तुपकर, ऋतिक तुपकर, श्याम तुपकर यांसह अनेकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
दुसऱ्या बाजूला, माजी सभापती सुरेश तुपकर यांनीही पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यांच्या तक्रारीनुसार, मिरवणुकीदरम्यान काही जणांनी त्यांना आणि त्यांच्या समर्थकांना अडवून काठ्यांनी मारहाण केली. आरोपींच्या हातातील काटेरी काठी पकडताना त्यांनाही दुखापत झाली असल्याचे त्यांनी सांगितले आहे. या तक्रारीवरून अनिल तुपकर आणि त्यांच्या गटातील काही जणांविरुद्धही गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
या घटनेमुळे गुंज गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गावात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी दोन्ही गटांतील संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे मिरवणुकीदरम्यान ध्वनीप्रदूषण, शिस्त आणि कायदा सुव्यवस्थेच्या नियमांचे पालन किती आवश्यक आहे, हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. तसेच, स्थानिक पातळीवरील राजकीय वाद अशा प्रकारे उफाळून आल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात, याचीही जाणीव या घटनेतून होत आहे.