
सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीला तिलांजली, बेफिकीर अन् टपोरीपणासारखे...; हर्षवर्धन सपकाळांची टीका
हे सरकार लुटारू असल्याचा गंभीर आरोप करत सपकाळ यांनी विविध मुद्द्यांवर श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी केली आहे. पुणे-मुंबईतील कथित जमीन घोटाळ्यांमध्ये किती आर्थिक गैरव्यवहार झाला, याची माहिती जनतेसमोर आणावी, अशीही मागणी त्यांनी केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर टीका करत त्यांनी काशीराम कोतवाल यांच्या पद्धतीशी तुलना केली.
महाराष्ट्रातील ड्रग्ज प्रकरणात गुजरात कनेक्शन समोर येत असल्याचा दावा करत त्यांनी कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी ‘सदरक्षणाय खलनिग्रहणाय’ या तत्त्वानुसार काम करावे, असे आवाहनही त्यांनी केले. ड्रग्ज प्रकरणात काँग्रेस यापुढे अधिक आक्रमक भूमिका घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कृषी क्षेत्राबाबत बोलताना त्यांनी अमेरिकेसोबत झालेल्या ट्रेड करारामुळे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना फटका बसल्याचा दावा केला. राज्यभर पदयात्रा काढण्याचा निर्णय घेतल्याचे सांगत हिंगोली आणि यवतमाळ येथे रॅली आयोजित केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
‘एपस्टीन फाईल’ प्रकरणामुळे अनेक नैतिक प्रश्न समोर आले असून, याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी त्यांनी केली. तसेच नरवणे यांच्या पुस्तकाबाबतही खुलासा करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली.
हे सुद्धा वाचा : उद्योगमंत्री उदय सामंत यांची मोठी घोषणा, म्हणाले; पुढील तीन ते चार महिन्यात…
काँग्रेस हा संविधानावर विश्वास ठेवणारा पक्ष असून हिंसेचा मार्ग स्वीकारणार नाही, असे स्पष्ट करत लोकशाही पद्धतीने आंदोलन करणे योग्य असले तरी चर्चा होणे आवश्यक असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. महाविकास आघाडी कायम राहावी ही काँग्रेसची भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनुपस्थितीबाबत मात्र आपल्याला माहिती नसल्याचे ते म्हणाले.