महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच, मराठीला हात लावाल तर...; हर्षवर्धन सपकाळांचा इशारा
मुंबई : मराठी भाषेचे संवर्धन झाले पाहिजे कारण मराठी ही केवळ एक भाषा नसून संस्कृती आहे, बाणा आहे, महाराष्ट्र धर्म आहे. काँग्रेसचा हिंदी भाषेला विरोध नाही तर तिसऱ्या भाषेच्या सक्तीला विरोध आहे परंतु मराठीच्या नावावर गुंडागर्दी खपवून घेतली जाणार नाही. आम्ही मारहाण करणार नाही तर मराठी शिकवू व ती टिकवू. महाराष्ट्रातील सर्वजन मराठीच आहेत या मराठीला हात लावाल तर खरबरदार, असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला.
मीरा भाईंदरमध्ये काँग्रेसने आयोजित केलेल्या “आम्ही मराठी, आम्ही भारतीय” मराठी भाषा कार्यशाळेत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बोलत होते. या कार्यक्रमात पुढे बोलताना हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, हिंदी सक्तीचा जो नंगानाच घातला गेला त्याचा उगम माजी सरसंघचालक गोलवकर यांच्या बंच ऑफ थॉट पुस्तकातून आलेला आहे. भाजपा व संघाला भारताचे संविधान मान्य नाही, विविधतेत एकता ही आपली ओळख आहे तर भाजपाला मात्र वन नेशन वन इलेक्शन, वन लँगवेज आणायची आहे. विविधता नाकारणारी विखारी व विषारी अशी ही संकल्पना बंच ऑफ थॉटमधून आलेली आहे. हिंदी, हिंदुत्व व हिंदुराष्ट्र ही संकल्पना भाजपा व संघाला राबवायची आहे, त्यासाठीच भाजपा सरकारने हा वाद जाणीवपूर्वक घडवून आणलेला आहे, असं सपकाळ म्हणाले.
या कार्यक्रमासाठी मीरा रोडच का निवडले हे सांगताना सपकाळ म्हणाले की, काँग्रेसची भूमिका नरोवा कुंजरोवा ची नाही. येथे पाय रोऊन ठामपणे भूमिका मांडण्यासाठी आलो आहे. ही विचाराची लढाई आहे, आम्ही मराठी, आम्ही भारतीय, हा संदेश देण्यासाठी मीरा रोडला आलो आहोत. मी मराठी बोलणार नाही हा माज योग्य नाही तसेच का बोलत नाही म्हणून मारणे हे सुद्धा चुकीचेच आहे. हिंदी सक्तीने शिक्षणाचे वाट्टोळे होणार आहे आणि पुढे जाऊन सक्तीचे मोफत शिक्षण कायदा सुद्धा रद्द केला जाऊ शकतो, असे सपकाळ म्हणाले.
प्रदेश कार्याध्यक्ष मुजफ्फर हुसेन यावेळी म्हणाले की, आता राम मंदिराचा मुद्दा संपलेला आहे त्यामुळे भाजापाने जातीवाद, प्रांतवाद व भाषावाद सुरु केला आहे. काँग्रेस सरकारने ७० वर्षात निर्माण केलेली देशाची संपत्ती विकली जात असताना तसेच जनतेचे मुलभूत प्रश्नावरून लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी भाषावाद सारखे मुद्दे उकरून काढले जात आहेत. या भागात इतर राज्यातून लोक आले व महाराष्ट्राने त्यांना आपले करून घेतले. कोणालाही जात, धर्म भाषेवरून वेगळी वागणूक दिली नाही. पण भाजपाने जाणीवपूर्वक भाषा वाद सुरु केला आहे त्यामागे राजकीय स्वार्थ आहे असे ते म्हणाले.