
जलसंकटावरून नगरसेवक आक्रमक!मास्टर प्लान तयार करण्यासह बोअरवेल पुनरुज्जीवन करण्याचा पालिकेकडे आग्रह
मुंबईवरील जलसंकटाचे सावट दिवसेंदिवस अधिक गडद होत चालले असून, त्याचे तीव्र पडसाद सोमवारी महापालिका सभागृहात उमटले आहेत. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर मुंबईकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला धारेवर धरले आहे. भविष्यातील तीव्र पाणीटंचाई टाळण्यासाठी मुंबईतील जलस्रोतांच्या संवर्धनाचा एक स्वतंत्र मास्टर प्लान तयार करावा, तसेच शहरातील बंद पडलेल्या सर्व बोरवेलचे पुनरुज्जीवन करावे, अशी आक्रमक मागणी लोकप्रतिनिधींनी लावून धरली. या गंभीर समस्येवर भाजपचे नगरसेवक आणि सभागृह नेते गणेश खनकर यांनी महापालिका सभागृहात एक महत्त्वपूर्ण निवेदन सादर केले. या निवेदनावर विविध प्रभागांतील ३० हून अधिक नगरसेवकांनी स्वाक्षऱ्या करत आपल्या भागातील पाणीटंचाईचे वास्तव मांडले.(फोटो सौजन्य – AI)
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या अप्पर वैतरणा, मध्य वैतरणा, मोडक सागर, तानसा, भातसा, विहार आणि तुळशी या धरणांमधील पाणी साठ्याबाबत माहिती घेतली असता, वाढत्या लोकसंख्येच्या प्रमाणात धरणांची खोली किंवा उंची वाढवण्याचे कोणतेही ठोस काम प्रशासनाकडून करण्यात आलेले नाही. शहरात उंच इमारतींची संख्या वाढत असताना वरच्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचत नसल्याने रहिवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. टंचाईच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने साठवणूक क्षमता वाढवण्यासाठी काय दूरदृष्टी ठेवली आहे, असा सवाल विरोधी पक्षांनी केला.
बागांना पाणी देणे, रस्ते धुणे आणि वाहने स्वच्छ करण्यासाठी पिण्यायोग्य पाण्याचा वापर तातडीने बंद करावा, अशी मागणी नगरसेवकांनी केली. याशिवाय मुंबईतील पारंपरिक तलावांची पाणी साठवण क्षमता वाढवावी आणि सर्व बोरवेलचे ऑडिट करून त्यांच्यासाठी रिचार्ज आराखडा तयार करावा, याकडेही प्रशासनाचे लक्ष वेधले. भाजपच्या नगरसेविका रीटा मकवाना यांनी सांगितले की, ‘जलवाहिन्यांच्या गळतीमुळे पिण्याच्या पाण्यात दूषित घटक मिसळत असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्यामुळे प्रशासनाने बोरवेलचे पुनरुज्जीवन करून पाणी शुद्धीकरणासह ते उपलब्ध करून द्यावे.
मुंबईची तहान भागवणारे सातही तलाव सध्या तळ गाठत आहेत, २१ जून २०२६ रोजी मुंबईच्या जलाशयांमध्ये एकूण क्षमतेच्या केवळ ८.६८ टक्के (१.२५ लाख दशलक्ष लिटर) जलसाठा शिल्लक होता. १४.४७ लाख दशलक्ष लिटर क्षमता असलेल्या या तलाव क्षेत्रांत गेल्या २४ तासांत एकाही ठिकाणी पावसाची नोंद झालेली नाही.उपलब्ध साठा केवळ ऑगस्टच्या मध्यापर्यंतच पुरू शकतो. गेल्या वर्षी २१ जून २०२५ रोजी हाच साठा २५.८७ टक्के होता, तर २०२४ मध्ये तो ५.३१ टक्के होता. या पाश्वभूमीवर, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर यांनी सभागृहात प्रशासनाची भूमिका स्पष्ट केली.