
उन्हाच्या तडाख्याने 9 मगरीची पिल्ले दगावली; वनविभागाच्या दिरंगाईवर ग्रामस्थ संतप्त
मिळालेल्या माहितीनुसार, आमनापूर परिसरातील अनुगडेवाडी येथील काळ्या ओढ्यालगत असलेल्या एका उसाच्या शेतात मगरीने अंडी घालून विण केली होती. रविवारी सकाळी सोयाबीन भांगलणीसाठी गेलेल्या महिलांना शेतात मगरीचा वावर दिसून आला. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता काही मगरीची पिल्ले मृतावस्थेत आढळून आली. ही माहिती शेतकरी व वन्यजीवप्रेमींनी तातडीने वनविभागाला दिली. मात्र, गंभीर स्वरूपाची घटना घडूनही दुपारी दीड वाजेपर्यंत वनविभागाचा एकही वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. अखेर केवळ एक वनमजूर घटनास्थळी दाखल झाला. त्यामुळे वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
वनविभागाच्या प्राथमिक तपासणीत वाढत्या तापमानामुळे आणि कडाक्याच्या उन्हामुळे नऊ पिलांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मृत पिलांचे पंचनामे करून त्यांचे दफन करण्यात आले. तसेच विणीतील पाच पिल्ले जिवंत आढळून आल्याने त्यांना काळजीपूर्वक ताब्यात घेऊन जवळील ओढ्यात सोडण्यात आले. पिलांना जन्म देणारी मादी मगरही सुरक्षित असल्याचे वनविभागाकडून सांगण्यात आले. उसाच्या शेतात मगरीची विण आढळणे आणि त्यातून पिल्लांचा जन्म होणे ही दुर्मिळ घटना मानली जाते. त्यामुळे या घटनेकडे वन्यजीव अभ्यासकांचेही लक्ष वेधले गेले आहे. मात्र, अशा महत्त्वाच्या घटनेत वनविभागाने वेळेत प्रतिसाद न दिल्यामुळे ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे.
मगर हा वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार अनुसूची-१ मधील अतिसंरक्षित प्राणी आहे. अशा प्राण्याच्या पिलांचा मृत्यू होऊनही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी आवश्यक गांभीर्य दाखवले नसल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. “जर वाघाची पिलं मृतावस्थेत आढळली असती तर संपूर्ण यंत्रणा तातडीने धावली असती. मग मगरीच्या पिलांच्या मृत्यूला किंमत नाही का?” असा संतप्त सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला. घटनेची चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात येत आहे.