
DCM Ajit Pawar Plan Crush Death MP Raut Nilesh Lanka paid tribute
Ajit Pawar Plane Crash : बारामती : राज्याचे लाडके नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा बारामतीमध्ये अपघात झाला असल्याची मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे. आज सकाळी 9 ते 9.15 वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला असल्याचे समोर आले आहे. बारामतीमध्ये लॅंडिंगदरम्यान अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला असून यामध्ये त्यांचा मृत्यू झाला आहे. अजित पवारांचे अपघाती निधन झाल्यानंतर राजकीय नेत्यांनी श्रद्धांजली वाहिली आहे.
बारामतीमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले आहे. विमानामध्ये अजित पवार यांच्यासोबतच त्यांचे सुरक्षारक्षक देखील उपस्थित होते. आज सकाळी लँडिंगदरम्यान हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. अजित पवार यांचे अकाली निधन झाल्यामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे. काँग्रेस नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना अश्रू अनावर झाले. त्यांना प्रतिक्रिया देणे देखील कठीण आहे.
हे देखील वाचा : अजित पवार यांचा अपघाती दुर्दैवी मृत्यू; दिवसभरात चार सभा होत्या नियोजित
राज्यावर दुःखाचा डोंगर – संजय राऊत
अजित पवारांच्या मृत्यूवर खासदार संजय राऊत म्हणाले, “ही अत्यंत धक्कादायक बातमी आहे. अजित पवार यांच्यासह महाराष्ट्राचे राजकारण, समाजकारण, हे बेचव आणि अळणी होईल. कार्यकर्त्यांना हवाहवासा वाटणारा, रोखठोक, दिलखुलास असे अजित पवारांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या जाण्याने राज्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज राज्याच्या राजकारणातला काळा दिवस आहे.” अशी प्रतिक्रिया खासदार संजय राऊत यांनी दिली आहे.
निलेश लंके यांची प्रतिक्रिया
खासदार निलेश लंके यांनी देखील अजित पवार यांच्या अपघाती निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणासाठी ही खूप मोठी दुर्घटना आहे. आत्तापर्यंतच्या इतिहासामध्ये अशी दुर्घटना घडली नाही, अजित पवार यांचे असे अकाली जाणे हा फक्त पवार कुटुंबाचा नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचे नुकसान आहे, असे म्हणता साश्रू नयनांनी खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
हे देखील वाचा : टोमणे, चिमटे सरळ भाषेत सणसणीत वार; अजित पवारांचे गाजलेले डायलॉग्स
संजय शिरसाट यांनी व्यक्त केला शोक
आमदार संजय शिरसाट यांनी देखील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनावर प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, अअजित पवारांच्या यांच्या मृत्यूंच्या माहितीने एक मोठा धक्का महाराष्ट्राला बसला आहे. हा असा एक नेता होता ज्याची राजकारणामध्ये सर्वांना आदरयुक्त भीती वाटत होती. की समोर दादा आहे. खऱ्या अर्थाने दादा हा शब्द त्यांच्यासाठी लागू होतो. राजकारणामध्ये अनेक संकटे त्यांच्यावर आली पण ते कधी डगमगले नाहीत. ते बेधडकपणे निर्णय घेत होते. कालच त्यांची आणि माझी शेवटची भेट झाली. काल कॅबिनेट मिटिंगला सुद्धा ते उपस्थित होते, अशा भावना आमदार संजय शिरसाट यांनी व्यक्त केल्या आहेत.