
गायीला ‘राष्ट्रीय पशू’ घोषित करा; मुस्लिम व बहुजन समाजाचे तहसीलदारांना निवेदन
वडूज : गायीला भारताचा ‘राष्ट्रीय पशू’ म्हणून घोषित करण्यात यावे, अशी मागणी करत खटाव तालुक्यातील मुस्लिम व बहुजन समाजाच्या वतीने तहसीलदार बाई माने यांना निवेदन देण्यात आले. यावेळी वडूज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे, इम्तियाज नदाफ, इम्रान बागवान, सत्यवान कमाने, तुषार बैले, इम्तियाज बागवान, सादिक मुल्ला, आमीन आगा, दाऊदखान मुल्ला, आमीन मुल्ला, सज्जाद शेख, सलीम काझी, इम्रान सर्फराज पठाण, दस्तगीर मुल्ला, सर्फराज बागवान, सोहिल मुल्ला आदीसह मुस्लिम व बहुजन समाजातील नागरिक उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहेत की, भारतीय संस्कृती, अर्थव्यवस्था आणि ग्रामीण जीवनात गायीचे असलेले महत्त्व अधोरेखित करण्यात आले आहे. गायीला केवळ प्राणी न मानता ‘माता’ म्हणून आदर दिला जातो. तिचे आध्यात्मिक, धार्मिक तसेच सांस्कृतिक स्थान महत्त्वपूर्ण असल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच ग्रामीण अर्थव्यवस्था आणि सेंद्रिय शेतीमध्ये गायीचे योगदान मोलाचे असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. दूध, गोमूत्र व शेण यांचा शेती आणि मानवी आरोग्यासाठी उपयोग होत असून, गोपालनामुळे पर्यावरणीय समतोल राखण्यास मदत होते, असेही निवेदनात म्हटले आहे.
गाय ही शांतता आणि अहिंसेचे प्रतीक असल्याचे नमूद करत गोवंश संरक्षणासाठी अधिक प्रभावी उपाययोजना आवश्यक असल्याची भूमिका निवेदनातून मांडण्यात आली. गायीला राष्ट्रीय प्राण्याचा दर्जा मिळाल्यास तिच्या संरक्षणाला अधिक कायदेशीर बळ मिळेल आणि गोहत्येसारख्या प्रकारांवर आळा बसेल, असा विश्वास निवेदनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. या मागणीची दखल घेऊन केंद्र सरकारकडे योग्य कार्यवाहीसाठी प्रस्ताव पाठवावा, अशी मागणी तहसील प्रशासनाकडे करण्यात आली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक घनश्याम सोनावणे यांनी बकरी ईदच्या शुभेच्छा देत सण शांततेत साजरा करण्याचे आवाहन केले तर इम्तियाज नदाफ यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.