कोल्हापूर : एकीकडे राज्याचा विकास तर दुसरीकडे कल्याणकारी योजना राबवल्या तसेच लाडकी बहीण, शेतकरी, महिला, कष्टकरी यांच्या पाठबळांबरोबरच करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या कृपेने राज्यात महायुतीची सत्ता आली आहे. अशी प्रित्कीया उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात दिली आहे. विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीची सत्ता आल्यानंतर उपमुख्यमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरात सदिच्छा भेट देऊन करवीर निवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा शुभारंभ कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन झाला होता. त्यामुळे कोल्हापुरातच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रात जनतेने महायुतीच्या बाजूने कौल दिला आहे. देवीचे दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलो असे सांगून दावोस येथे झालेल्या करारामुळे राज्यात १५ लाख तरुणांना रोजगाराची संधी मिळणार आहे. साडेसात लाख कोटींची गुंतवणूक होणार आहे. महाराष्ट्रात ५२ टक्के परदेशी गुंतवणूक होणार आहे. अनेक उद्योग महाराष्ट्रात आकर्षित होत आहेत. विरोधक यावर टीका करत असले तरी टिकेला आम्ही कधीच उत्तर देणार नाही. आम्ही आमचे काम दाखवणार असे शिंदे म्हणाले.
मराठा आरक्षणाबाबत महायुती सरकारची जी मागील भूमिका होती. तीच भूमिका कायम राहणार आहे. फडणवीस सरकारने आरक्षण दिले होते पण महाविकास आघाडीला ते टिकवता आले नाही. आणि तेच कोर्टात गेलेले आहेत परंतु आमच्या सरकारने दिलेले आरक्षण हे कुठल्याही अन्य आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण दिले आहे. त्यामुळे हे टिकणारच, असेही त्यांनी सांगितले. यावेळी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, माजी खासदार संजय मंडलिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार चंद्रदीप नरके यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
हे सुद्धा वाचा : उदयनराजेंचा छावा चित्रपटाच्या दिग्दर्शकाला थेट फोन; केली ‘ही’ सूचना
जरांगे पाटलांचा आमरण उपोषणचा एल्गार
महायुतीचे सरकार येऊन दोन महिने झाले असून एका मागून एक अडचणी येत आहे. आता मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आमरण उपोषण सुरु केले आहे. त्यांच्या जालन्यातील अंतरवली सराटी येथे मनोज जरांगे पाटील उपोषणावर बसले आहेत. त्यांनी ओबीसीमधून मराठा आरक्षण मिळावे यासाठी आमरण उपोषण सुरु केले आहे. मागील दोन वर्षापासून राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर आलेला आहे. मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण, आंदोलन आणि मोर्चा काढून जोरदार आरक्षणाची मागणी केली आहे. मराठा समाज हा कुणबी असून सर्व मराठा समाजाला कुणबी अंतर्गत ओबीसी मधून आरक्षण देण्यात यावे अशी मूळ मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. मात्र ओबीसीमधून मराठा आरक्षण देण्यात महायुतीला अद्याप यश आलेले नाही. यामुळे महायुती सरकार विरुद्ध मनोज जरांगे पाटील असे चित्र अनेकदा राज्यामध्ये दिसून येत आहे.