
फोटो सौजन्य - Social Media
धाराशिव, जिल्हा प्रतिनिधी : आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळावी या उद्देशाने शासनामार्फत सुरू करण्यात आलेली १०८ रुग्णवाहिका सेवा सध्या धाराशिव जिल्ह्यात गंभीर वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. जनतेसाठी जीवनरक्षक मानली जाणारी ही सेवा आता अनेकांच्या मते अक्षरशः ‘व्हेंटिलेटर’वर गेली असून, मदतीऐवजी त्रास देणारी यंत्रणा बनल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
जिल्ह्यातील अनेक भागांतून या सेवेविरोधात सातत्याने तक्रारी समोर येत आहेत. गंभीर अवस्थेतील रुग्णांसाठी रुग्णवाहिका वेळेवर न पोहोचणे, अनेकदा फोन करूनही प्रतिसाद न मिळणे, चुकीची माहिती देणे, अनावश्यक विलंब करणे, तसेच काही कर्मचाऱ्यांच्या वागणुकीबाबतही नाराजी व्यक्त केली जात आहे. परिणामी, उपचारासाठी प्रत्येक क्षण महत्त्वाचा असताना रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना मानसिक तणाव सहन करावा लागत असल्याचे चित्र दिसत आहे.
विशेष बाब म्हणजे, या संदर्भातील अनेक तक्रारी प्रशासनाकडे पोहोचल्याचे सांगितले जात असले तरी परिस्थितीत अपेक्षित सुधारणा झालेली दिसून येत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची भावना वाढत असून, ‘१०८ सेवा खरोखर जनतेसाठी आहे की केवळ कागदोपत्री व्यवस्था?’ असा सवाल उपस्थित केला जात आहे. नागरिकांच्या म्हणण्यानुसार, शासनाकडून या सेवेसाठी दरवर्षी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातो. मात्र प्रत्यक्षात सेवेच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण होत असल्याने या निधीचा वापर नेमका कशासाठी होतो, याची चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे. काही नागरिकांनी तर ही सेवा ‘शासकीय निधी खर्च करण्याचे माध्यम’ बनल्याचा आरोपही केला आहे.
आरोग्य व्यवस्थेतील अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या १०८ रुग्णवाहिका सेवेची प्रशासनाने तातडीने दखल घ्यावी, प्रत्यक्ष परिस्थितीची तपासणी करून जबाबदारांवर कारवाई करावी आणि सेवा अधिक सक्षम व कार्यक्षम बनवावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे. तसेच रुग्णांचा या सेवावरील विश्वास पुन्हा निर्माण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. रुग्णाच्या जीवापेक्षा कोणतीही यंत्रणा मोठी असू शकत नाही. त्यामुळे वेळेशी स्पर्धा असलेल्या आपत्कालीन आरोग्य सेवेत होणारा हलगर्जीपणा किती गंभीर परिणाम घडवू शकतो, याची जाणीव प्रशासनाला कधी होणार, हा खरा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.