
धाराशिव तालुक्यातील २४७ मतदान केंद्रांसाठी ईव्हीएम मशीनची कमिशनिंग व सिलिंग प्रक्रिया पूर्ण
धाराशिव: शनिवारी (३१ जानेवारी) येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) तालुक्यातील एकूण २४७ मतदान केंद्रांवर वापरण्यात येणाऱ्या ईव्हीएम मशीनची कमिशनिंग आणि सिलिंग प्रक्रिया उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत पार पडली. या प्रक्रियेत २७४ कंट्रोल युनिट (सीयू) व २७४ बॅलट युनिट (बीयू) तसेच राखीव ४८ बीयू व ४८ सीयू यांचा समावेश होता. प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सर्व मशीन राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर स्ट्रॉंग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या.
या कामासाठी एकूण १२४ कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. यामध्ये ग्राम महसूल अधिकारी, महसूल सेवक, शिक्षण विभागातील कर्मचारी, सर्व क्षेत्रीय अधिकारी तसेच आयटीआयचे मास्टर ट्रेनर यांचा समावेश होता. संपूर्ण प्रक्रियेदरम्यान पुरेसा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. या प्रक्रियेवर नियंत्रण अधिकारी म्हणून निवडणूक निर्णय अधिकारी ओमकार देशमुख, सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मृणाल जाधव, निवडणूक नायब तहसीलदार घृष्णेश्वर स्वामी आणि निवासी नायब तहसीलदार महादेव शिंदे उपस्थित होते.
दरम्यान, ७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या परीक्षेसाठी शिक्षकांची यादी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून मागविण्यात आली असून, माननीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार संबंधित कर्मचाऱ्यांच्या जागी पर्यायी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. तसेच सर्व निवडणूक कर्मचाऱ्यांना ४ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची माहिती प्रशासनाने दिली.
“आपल्या कुटुंबातील मार्गदर्शक आणि राज्याचे लाडके नेते अजितदादा म्हणजे माझे आजोबा. त्यांच्या निधनाच्या दुःखातून आम्ही अद्याप सावरलेलो नाही. तरीही जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक कुटुंबातीलच कार्यकर्ते लढवत असल्याने, दुःख बाजूला ठेवून प्रचाराचे कर्तव्य पार पाडत आहे,” अशा भावना मल्हार पाटील यांनी एका प्रचारसभेत व्यक्त केल्या.
खामसवाडी येथे आयोजित सभेत त्यांनी जिल्हा परिषद गटातील भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी महायुतीचे उमेदवार विश्वास कोकणे तसेच पंचायत समितीचे उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचारासाठी मतदारांना संबोधित केले.
देशात व राज्यात महायुतीचे सरकार असून, या सरकारच्या माध्यमातून खामसवाडी गटातील विकासकामांसाठी अधिकाधिक निधी मंजूर करून घेता येईल. जिल्हा परिषदेतून जास्तीत जास्त निधी आपल्या मतदारसंघात आणण्यासाठी या गटातील प्रतिनिधी मुख्यमंत्री तसेच आमदार राणा पाटील यांच्या विचारांचे असणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
“समाजातील तळागाळातील लोकांच्या अडचणी समजून घेणारे आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्याची ताकद असलेले उमेदवार म्हणून महायुतीचे उमेदवार विश्वास कोकणे यांना मतदान करून, तुमच्यातील एक सहकारी राणादादांच्या सोबतीला पाठवा. त्यामुळे विकासकामांसाठी कुठेही अडचण येणार नाही,” असे आवाहन मल्हार पाटील यांनी केले. सभेला खामसवाडी गटातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.