मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तातडीच्या मदतीची मागणी
राज्यातील अनेक भागांमध्ये अपुरा आणि अनियमित पाऊस झाल्याने शेतीचे मोठे नुकसान होत असल्याचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर लातूर ग्रामीणचे माजी आमदार धीरज विलासराव देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी सर्वसमावेशक विशेष दुष्काळ निवारण पॅकेज जाहीर करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.
धीरज देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या निवेदनात मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीसमोरील परिस्थितीकडे लक्ष वेधले आहे. पावसात मोठे खंड पडणे, भूजल पातळी खालावणे आणि जमिनीत पुरेसा ओलावा न राहणे यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी वाढल्याचे त्यांनी म्हटले आहे.
अनेक ठिकाणी पेरण्या रखडल्या असून, काही भागांमध्ये उभी पिकेही अडचणीत आल्याचा दावा देशमुख यांनी केला आहे. त्यामुळे बाधित जिल्ह्यांमध्ये जिल्हा आणि तालुकास्तरावर तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करण्यात यावेत. परिस्थिती गंभीर असलेल्या भागात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना शासनाच्या मदतीचा लाभ द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना ती थेट त्यांच्या बँक खात्यात DBTच्या माध्यमातून जमा करावी, असेही त्यांनी सुचवले आहे.
संकटाच्या काळात शेतकऱ्यांवरील आर्थिक ताण आणखी वाढू नये यासाठी शेती कर्जांचे पुनर्गठन करावे, व्याजमाफीचा निर्णय घ्यावा आणि सक्तीची कर्जवसुली तात्पुरती स्थगित करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
यासोबतच पावसावर अवलंबून असलेल्या कोरडवाहू शेतकऱ्यांना विशेष आर्थिक मदत देण्याची गरज असल्याचे देशमुख यांनी म्हटले आहे. पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी आवश्यक त्या भागात चारा छावण्या आणि चारा बँका तातडीने सुरू कराव्यात, अशीही मागणी त्यांनी केली.
शेतकऱ्यांना केवळ तात्पुरती मदत न देता पीक संरक्षण, आर्थिक सहाय्य आणि दीर्घकालीन उपाययोजनांचा समन्वय साधून सरकारने बळीराजाला आधार द्यावा, असे धीरज देशमुख यांनी पत्रात नमूद केले आहे.






