संग्रहित फोटो
पुणे : तुर्की सफरचंदावर पुण्यातील व्यापाऱ्यांनी बहिष्कार टाकला म्हणून त्यांना पाकिस्तानमधून धमकी येत आहे, परंतु महायुतीचे सरकार त्यांच्या पाठीशी असून, व्यापाऱ्यांच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. यशदा येथे आयोजित राज्यातील महापालिका आयुक्त आणि नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या परिषदेसाठी शिंदे आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.
ते म्हणाले, नगर विकास विभागाच्या माध्यमातून यशदा येथे शहर विकासासाठी या परिषेदेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे मुख्यमंत्री, राज्यातील सर्व महापालिका आयुक्त, नगरपालिका मुख्याधिकारी येथे उपस्थित आहेत. शहरातील अडचणी, धोरणे आणि भूमिका, नवीन नियम, विकास आराखडा आणि शहर विकास याबाबत या परिषदेत भर दिला जाणार आहे. राज्यातील विविध शहरातील त्यांच्या भागातील माहिती सांगणार असून, त्यावर चर्चा करणार आहेत. यातून एक धोरणतात्मक निर्णय घेऊन शहरांचा समतोल विकास झाला पाहिजे यावर येथे ऊहापोह होणार आहे. सर्व शहरांना न्याय मिळाला पाहिजे हे आमच्या सरकारचे धोरण असून, नियोजनबध्द विकास झाला पाहिजे यासाठी काम करण्यास आमचे प्राधान्य असेल.
पीएमआरडीएचा विकास आराखडा जरी माझ्या कार्यकाळात झाला असला तरी तो रद्द झाला कारण त्यात काही त्रुटी असल्याचे शिंदे यांनी यावेळी मान्य केले. विकास आराखडा हा त्या शहरातील नागरिकांच्या विकासाचा विचार करून झाला पाहिजे. त्यामुळे नियोजित शहर कसे असेल याचा विचार करून व त्रुटी दूर करून नव्याने हा आराखडा तयार करण्याचा प्रयत्न केले जात आहे.
सर्वोच्च न्यायालयाने महापालिका निवडणुकीबाबत जे आदेश दिले आहेत. त्यानुसार निवडणूक आयोग काम करत असून, ती प्रक्रिया पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. महायुतीमध्ये लोकसभा, विधानसभा लढलो, मोठ्या मताधिक्याने जिंकलो त्यामुळे आमची जबाबदारी अधिक वाढली आहे. आगामी महापालिका व स्थानिक स्वराज्य निवडणुका आम्ही महायुती म्हणून लढणार असून, त्याही मोठया मताधिक्क्याने जिंकू असा विश्वास शिंदे यांनी यावेळी व्यक्त केला.
राज्यभर भारतीय लष्कराचे तिन्ही दल यांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी तिरंगा रॅली काढली गेली आहे. भारतीय लष्कराचे अभिनंदन करतो आणि लष्कराच्या पाठीशी उभे राहिलेले, ठोस निर्णय घेतलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे अभिनंदन करतो. असेही यावेळी शिंदे यांनी सांगितले.