'सातबारा कोरा करा'; रविकांत तुपकरांच्या नेतृत्वाखाली विधानभवनाबाहेर शेतकऱ्यांचे आक्रमक आंदोलन, झाडावर चढून कार्यकर्त्यांचा अनोखा विरोध
क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मंत्रालय आणि विधानभवन परिसरात झाडांवर चढून आंदोलन सुरू केले. काही आंदोलकांनी हातात फासाची दोरी घेतल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनली. झाडांवरून खाली उतरण्यास आंदोलकांनी सुरुवातीला नकार दिल्याने प्रशासनाची धावपळ उडाली. अखेर पोलिसांनी समजूत काढून त्यांना सुरक्षितपणे खाली उतरवले.
बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी …
या आंदोलनामागील प्रमुख मागणी म्हणजे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी आणि ‘सातबारा कोरा करा’ ही होती. आंदोलकांनी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.
आंदोलन अधिक तीव्र करत कार्यकर्त्यांनी विधानभवन परिसरात कापूस फेकून सरकारच्या कृषी धोरणांविरोधात निषेध नोंदवला. शेतकऱ्यांच्या उत्पादनाला योग्य भाव, कर्जमाफी आणि आर्थिक दिलासा देण्याची मागणी यावेळी करण्यात आली.
परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यानंतर शेतकरी नेते रविकांत तुपकर आणि आंदोलनात सहभागी झालेल्या अनेक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईनंतर विधानभवन परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला.
आंदोलकांचे म्हणणे आहे की, राज्यातील शेतकरी आर्थिक संकटातून जात असून वाढते कर्ज, उत्पादन खर्च आणि नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक शेतकरी अडचणीत आहेत. त्यामुळे सरकारने तातडीने सरसकट कर्जमाफीचा निर्णय घ्यावा आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी पुन्हा एकदा केली. दरम्यान, या आंदोलनामुळे विधानभवन परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत कायदा व सुव्यवस्था कायम ठेवली असून पुढील कारवाई सुरू आहे.
बळीराजा सुखावणार… राज्यातील आतापर्यंतची सर्वात मोठी कर्जमाफी …






