Jalgaon News: २ रुपयांचा भाव पाहून शेतकऱ्याचा संताप! (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
जळू येथील शेतकरी चंद्रसिंग पाटील यांनी आपल्या दोन एकर क्षेत्रात मोठ्या आशेने भेंडीची लागवड केली होती. पीक जोमात आल्यानंतर मशागत, नांगरणी, रोटाव्हेटर, बियाणे, लागवड, रासायनिक खते, कीटकनाशक फवारणी, निंदणी, तोडणी मजुरी आणि वाहतूक असा मिळून आतापर्यंत सुमारे सव्वा ते दीड लाख रुपयांचा मोठा खर्च झाला होता. या पिकातून त्यांना सुमारे ७० क्विंटलचे उत्पादन मिळाले.
मात्र, बाजारात नेल्यानंतर व्यापाऱ्यांनी केवळ २ रुपये प्रतिकिलो असा हास्यास्पद भाव दिला. खर्चही वसूल होत नसल्याने, अत्यल्प दरात माल विकण्यापेक्षा संतप्त पाटील यांनी भेंडी रस्त्यावर फेकली. Jalgaon News:
या भीषण मंदीचा फटका केवळ शेतकऱ्यांनाच नाही तर स्थानिक व्यापाऱ्यांनाही बसत आहे. आम्ही हा शेतमाल मुंबईच्या बाजारपेठेत पाठवतो, परंतु सध्या तेथे मालाला अजिबात उठाव नाही. चांगल्या प्रतीच्या भेडीला मुंबईत अवघा ७ ते ८ रुपये किलो भाव मिळत आहे. काटा खरेदी, हमाली आणि मुंबईपर्यंतचा वाहतूक खर्च गृहीत धरल्यास व्यापाऱ्यांनाही हा व्यवसाय परवडेनासा झाला आहे, अशी हतबलता उमरेकर व्यापारी किशोर पाटील यांनी व्यक्त केली.
Jalgaon Highway Accidents: ‘दुर्घटनेतील बळींना न्याय द्या!’ नगरसेवक …
भेंडीच्या दरात झालेल्या प्रचंड घसरणीमुळे एरंडोल परिसरातील शेकडो भाजीपाला उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. शासनाने आणि कृषी विभागाने या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक भरपाई द्यावी आणि शेतमालाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य हमीभाव मिळवून द्यावा, अशी एकमुखी मागणी आता जोर धरू लागली आहे.
Jalgaon Crime: घाबरवण्यासाठी केला हवेत गोळीबार; व्हिडिओ काढल्याने …
कांद्याचे भाव थोडे जरी वाढले तरी सर्वत्र ओरड केली जाते आणि महागाईचा डांगोरा पिटला जातो. मात्र, जेव्हा शेतकऱ्याचा माल कवडीमोल भावाने विकला जातो किंवा रस्त्यावर फेकण्याची वेळ येते, तेव्हा कुणीही अवाक्षर काढत नाही. लाखो रुपये खर्च करून पिकवलेला माल रस्त्यावर फेकताना काळजाचे पाणी होते. या दयनीय परिस्थितीची सरकार आणि प्रशासन दखल घेणार का?
चंद्रसिंग शांताराम पाटील, (पीडित शेतकरी, जळू ता. एरंडोल)






