फोटो सौजन्य - Social Media
बुलढाणा जिल्ह्यात खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांनी मशागतीची बहुतांश कामे पूर्ण केली असली, तरी अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरण्या लांबणीवर पडल्या आहेत. मृग नक्षत्रात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे शेतकरी आता चिंताग्रस्त झाला असून, काळ्या आईची ओटी भरण्यासाठी पावसाची आतुरतेने वाट पाहत आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला डिझेल टंचाईमुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अनेक पेट्रोल पंपांवर ट्रॅक्टरसाठी आवश्यक असलेले डिझेल मिळत नसल्याने मशागतीची कामे रखडली होती. मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर डिझेलचा पुरवठा सुरळीत झाल्याने शेतकऱ्यांनी नांगरणी, वखरणी आणि इतर पूर्वतयारीची कामे पूर्ण केली. आता मात्र पावसाअभावी ही सर्व तयारी निष्फळ ठरत असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये आहे.
डिझेलच्या वाढलेल्या किमतींचा परिणाम ट्रॅक्टर सेवांच्या दरांवरही झाला आहे. नांगरणी, रोटाव्हेटर, वखरणी आणि पेरणीसाठी ट्रॅक्टरचे भाडे वाढल्याने शेतीचा खर्च आणखी वाढला आहे. आधीच खत, बियाणे आणि इतर कृषी निविष्ठांच्या वाढत्या किमतींमुळे अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत आहे.
दरम्यान, शेतीतील वाढत्या यांत्रिकीकरणामुळे पशुधनाचा वापर कमी झाला असून ग्रामीण भागात मजुरांची कमतरताही प्रकर्षाने जाणवत आहे. अनेक मजूर बांधकाम क्षेत्र किंवा मोठ्या शहरांकडे वळल्याने शेतीसाठी मनुष्यबळ उपलब्ध करणे कठीण बनले आहे. त्यामुळे बहुतांश शेतकरी ट्रॅक्टर आणि यांत्रिक साधनांवरच अवलंबून राहू लागले आहेत.
सध्या बुलढाणा जिल्ह्यातील बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत असून, वेळेत पाऊस झाल्यास पेरणीला वेग मिळेल आणि खरीप हंगाम सुरळीत पार पडेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. मात्र पावसाचा विलंब कायम राहिल्यास उत्पादनावर परिणाम होण्याबरोबरच शेतकऱ्यांच्या आर्थिक अडचणी आणखी वाढण्याची भीतीही व्यक्त होत आहे.






