
राज्यात ‘मुंढे’ ब्रँड धडाका, सोलापुरात मात्र शांतता! (Photo Credit- X)
विशेष म्हणजे सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर, तुळजापूर आणि अक्कलकोट ही धार्मिक स्थळे असून या ठिकाणी दररोज हजारो भाविक येत असतात त्या ठिकाणी प्रसाद म्हणून पेढा व अन्य वस्तू घेतल्या जातात. तर हॉटेल व्यवसाय ही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालतो. अशा ठिकाणीच भेसळखोरांचे फावते आणि भेसळयुक्त पदार्थ विकले जातात अशा तक्रारी भाविकातून कायम होत असतात. त्यातच आता आषाढी यात्रेची चाहूल लागताच पंढरपूरात लाखो विठ्ठल भक्त दाखल होत असतात.
पेढे, मिठाई, दूध, तूप, तेलकट खाद्यपदार्थ आणि हॉटेलमधील जेवणाच्या गुणवत्तेबाबत वारंवार तक्रारी येत असतानाही अन्नभेसळ विभागाकडून केवळ कागदी घोडे नाचवले जात असल्याची चर्चा असून केवळ किरकोळ कारवाई दाखविली जाते. परंतू ठोस उपाययोजना करण्यात अन्न भेसळ विभागाचे अधिकारी अपयशी ठरले असल्याचे दिसून येते. त्यामुळे “राज्यात धाडी… आणि सोलापुरात शांतता” अशी उपरोधिक प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. काही अधिकारी पुण्यात ट्रेनिंगमध्ये व्यस्त, तर काही रजेवर असल्याने विभागाचा कारभार अक्षरशः वाऱ्यावर सोडण्यात आल्याची भावना आहे. त्यामुळे भेसळखोरांना अभय कोणाचे? हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.
दरम्यान, पंढरपूरातील पेढा कारखाने, दूध डेअऱ्या, मिठाई दुकाने आणि हॉटेलांची तातडीने तपासणी करून नमुने घेण्याची मागणी आता विठ्ठल भक्तांकडून जोर धरू लागली आहे. भाविकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्यांना वाचवणाऱ्या अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे,” अशी संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करत आहेत. कायद्याचे पालन करणारे अधिकारी म्हणून तुकाराम मुंढे यांनी राज्यभर दाखवलेली आक्रमकता पाहता, आता सोलापुर जिल्ह्यातील सुस्त अधिकाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारणार का? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कारवाई संदर्भात वरिष्ठांचे आदेश आहेत. मात्र पुणे येथे ट्रेनिंग असल्याने मागील दोन दिवस ट्रेनिंगसाठी गेलो होतो. त्यानंतर रजेवर असून सोमवारी कामावर रूजू होणार आहे. त्यानंतर माहिती दिली जाईल. सुनील जिंतूरकर सहाय्यक आयुक्त, पंढरपूर-मोहोळ विभाग