उंब्रजमध्ये होणार 225 कोटींचा अत्याधुनिक उड्डाणपूल; वाहनचालकांना होणार मोठा फायदा
कराड : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघातील महत्त्वाच्या बाजारपेठांपैकी असलेल्या उंब्रज (ता.कराड) येथे 225 कोटी रुपयांच्या पारदर्शक उड्डाणपुलाचे सादरीकरण नुकतेच करण्यात आले. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी आमदार मनोज घोरपडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. या पुलाचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांसमोर सादरीकरण केले.
यावेळी राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी संजय कदम, महेश शितोळे, गणेश सूर्यवंशी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. हा उड्डाणपूल हा तारळी नदीपासून सुरू होऊन उत्तरमांड नदीपर्यंत जाणारा एकूण 1200 मीटर लांबीचा असणार असून, वरून सहा लेन आणि खालून आठ लेन असलेला हा पूल अत्याधुनिक आणि पारदर्शक असेल, असे स्पष्ट करण्यात आले.
नगरपंचायत स्थापनेसाठी प्रयत्न
यावेळी बोलताना आमदार घोरपडे म्हणाले, ‘उंब्रजमध्ये पारदर्शक उड्डाणपूल व्हावा, ही सर्व उंब्रजवासियांची मागणी होती. ती आता प्रत्यक्षात साकार होत आहे. यामुळे उंब्रजच्या वैभवात भर पडणार आहे. उंब्रजमध्ये सुसज्ज शासकीय विश्रामगृह उभे राहणार असून, त्याला मंजुरी मिळाली आहे. अप्पर तहसील, सब-रजिस्ट्रार कार्यालय आणि नगरपंचायत स्थापन करण्यासाठी देखील प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
वाहतूक कोंडीवर कायमस्वरूपी उपाय
उंब्रज व परिसरात साखर कारखान्यांमुळे ऊस वाहतूक मोठ्या प्रमाणात होते. त्यामुळे दरवर्षी वाहतूक कोंडीचा गंभीर प्रश्न उभा राहत होता. या पुलामुळे उंब्रजसह सुमारे 35 गावांच्या दळणवळणाचा प्रश्न सुटणार असून, नागरिक व व्यापाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
गडकरी-उदयनराजे यांचे सहकार्य
या प्रकल्पासाठी 225 कोटी रुपयांची निविदा लवकरच निघणार असून, केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आणि खासदार उदयनराजे भोसले यांच्या सहकार्यामुळे यास गती मिळाली आहे. या पुलाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करण्याचा निर्धार आमदार मनोज घोरपडे यांनी व्यक्त केला.
पुलाच्याच मुद्यावरून राजकारण तापलं
दुसऱ्या एका घटनेत, कल्याण शीळ रस्त्यावर असलेल्या पलावा पूलावरुन राजकारण चांगले तापले आहे. मनसे नेते राजू पाटील यांनी पलावा पूलाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूलाच्या कामात कोणत्या त्रूटी आहेत? हे दाखवून दिले. पूलाचे काम पूर्ण नाही. ठेकेदाराने हा पूल संबंधित प्रशासनाला अद्याप हँडओव्हर केलेला नाही. तरी देखील स्थानिक आमदारांनी घाईघाईने हा पूल वाहतूकीसाठी खुला केला. या प्रकरणात एसीबीकडे तक्रार केली पाहिजे, असे देखील त्यांनी विधान केले आहे.