
अनेक ठिकाणी गॅस टंचाई कायम; तीन आठवड्यांपासून सिलेंडर नाहीच, नागरिकांचे हाल
रत्नागिरी : कणकवली तालुक्यातील फोंडा घाट परिसरातील गावांमध्ये मागील तीन आठवड्यांपासून इंडेन गॅसची गाडी न आल्याने सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. रशिया-युक्रेन किंवा मध्यपूर्वेतील युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या पुरवठा साखळीतील विस्कळीतपणाचा फटका आता थेट ग्रामीण भागातील चुलींपर्यंत पोहोचला असल्याचे चित्र दिसत आहे.
सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने तापमानाचा पारा वाढलेला आहे. अशा कडक उन्हात फोंड्या गावातील परिसरातील नागरिक मुख्य रस्त्यावर गॅसच्या गाडीची वाट पाहत तासनतास उभे राहत आहेत. सकाळी लवकर येऊनही पाच-पाच तास गाडीची प्रतीक्षा करावी लागत असल्याने अबालवृद्धांचे हाल होत आहेत. गाडी येईल, या आशेवर लोक आपली कामे सोडून बाजारपेठेत ठाण मांडून बसले आहेत, मात्र पदरी निराशाच पडत आहे.
व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांची कोंडी
केवळ घरगुती वापरासाठीच नाही, तर स्थानिक व्यापारी आणि हॉटेल व्यावसायिकांनाही या टंचाईचा मोठा फटका बसला आहे. सिलिंडर वेळेवर उपलब्ध होत नसल्याने हॉटेल चालवणे कठीण झाले असून, अनेकांवर व्यवसाय बंद ठेवण्याची वेळ आली आहे. गॅसअभावी घरची चूल पेटवणे कठीण झाल्याने ग्रामीण भागातील महिला वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
दुर्गम भागात वितरणाचे नियोजन कोलमडले
कणकवली तालुक्यातील या दुर्गम भागात गॅस वितरणाचे नियोजन कोलमडले असल्याचे स्पष्ट दिसत आहे. नियमित पुरवठा का होत नाही?, तीन आठवड्यांचा खंड कशामुळे पडला?, उन्हाचा त्रास सहन करणाऱ्या नागरिकांना वाली कोण?, असे अनेक प्रश्न आता स्थानिक नागरिक विचारत आहेत. संबंधित गॅस एजन्सीने आणि प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन कोंढाणा परिसरात त्वरित सिलिंडरची गाडी पाठवावी, अन्यथा, आंदोलन करण्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
गॅस वितरणात मोठ्या अडचणी
शहरी आणि ग्रामीण भागातील एलपीजी गॅस वितरणात होत असलेला भेदभाव त्वरित दूर करावा, या मागणीसाठी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या वतीने मुख्यमंत्री आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्र्यांना निवेदन देण्यात आले आहे. ग्रामीण भागातील ग्राहकांना गॅस सिलिंडरसाठी शहरी भागाच्या तुलनेत दुप्पट प्रतीक्षा करावी लागत असल्याचा आरोप करत, हा अन्याय दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा पंचायतीने दिला आहे.