
आता सरावातही गोविंदांना मिळणार विमाकवच! ७५ दिवसांसाठी १० लाखांचे संरक्षण; राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनचा पुढाकार
दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच राज्यभरातील गोविंदा पथकांनी सरावाला सुरुवात केली आहे. मानवी मनोरे उभारताना सरावादरम्यान अपघात होण्याच्या घटना लक्षात घेऊन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने यंदा अतिरिक्त सराव करणाऱ्या गोविंदांसाठी विशेष अपघाती विमा योजना जाहीर केली आहे. ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या या योजनेअंतर्गत प्रत्येक गोविंदाला १० लाख रुपयांचे विमा संरक्षण, तर अपघात झाल्यास रुग्णालयीन उपचारासाठी दोन लाख रुपयांपर्यंतचा खर्च उपलब्ध होणार आहे.(फोटो सौजन्य – istock)
दहीहंडीपूर्वी अनेक मंडळे दोन ते अडीच महिने सातत्याने सराव करतात. उंच मानवी मनोरे रचताना तोल जाणे, पडणे, हात-पायांना फॅक्चर होणे, डोक्याला किंवा पाठीच्या कण्याला दुखापत होणे, अशा घटना दरवर्षी घडतात. गंभीर दुखापतींमुळे उपचाराचा खर्चही मोठा असतो. ही बाब लक्षात घेऊन सरावादरम्यान गोविंदांना आर्थिक आधार मिळावा, या उद्देशाने ही योजना सुरू करण्यात आली आहे.
८८ मे महिन्याच्या अखेरपासून राज्यातील ९० हून अधिक गोविंदा मंडळांनी दहीहंडीचा सराव सुरू केला आहे. प्रो-गोविंदामुळे स्पर्धा वाढली असून प्रत्येक मंडळ अधिक सुरक्षित आणि भक्कम मानवी मनोरे उभारण्यासाठी करून सराव करत आहे. सरावादरम्यानही अपघाताची शक्यता लक्षात घेऊन गोविंदांना आर्थिक संरक्षण मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनच्या प्रयत्नांनी ओरीयंटल इंशुरन्स कंपनीशी वाटाघाटी करून ही विशेष विमा योजना सुरू केली आहे, असे मत बाळा पडेलकर, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशन यांनी मांडले आहे.
या योजनेचा कालावधी ७५ दिवसाचा असून, ६ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत विमा संरक्षण लागू राहणार आहे. १४ ते ७० वर्षे वयोगटातील गोविंदांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. तसेच ७१ ते ७५ वर्षे वयोगटातील प्रशिक्षक आणि सहाय्यक प्रशिक्षकांनाही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. प्रत्येक सदस्यासाठी ११० रुपये प्रीमियम भरावा लागणार असून, यासाठी मंडळांनी चर्चगेट येथील ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीच्या कार्यालयात आवश्यक कागदपत्रांसह नोंदणी करून प्रीमियम भरावा लागणार आहे.
असोसिएशनच्या माहितीनुसार, ही योजना अधिक कालावधीचा सराव करणाऱ्या मंडळांसाठीच लागू आहे. दरवर्षी गुरुपौर्णिमेपासून दहीहंडी उत्सवापर्यंत स्वतंत्र विमा संरक्षण योजना राबविण्यात येते.मात्र, त्याआधी सुरू होणाऱ्या सरावादरम्यानही गोविंदांना विमा संरक्षण मिळावे, या उद्देशाने ही अतिरिक्त योजना सुरू करण्यात आली आहे. दहीहंडी उत्सवात साहसाइतकेच सुरक्षिततेलाही महत्त्व आहे.त्यामुळे सर्व गोविंदा मंडळांनी या विमा योजनेचा लाभ घेऊन सुरक्षित सरावाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य दहीहंडी गोविंदा असोसिएशनने केले आहे.