
‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्हचा दमदार प्रारंभ; प्रेरणा, सामाजिक बदल आणि उद्योजकतेवर विचारमंथन
कॉन्क्लेव्हच्या पहिल्या सत्राची सुरुवात सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘शी से’च्या संस्थापक त्रिशा शेट्टी यांच्या ‘हू सेज़? शी सेज़’ या सत्राने झाली. त्रिशा शेट्टी यांनी धैर्याच्या विविध पैलूंवर भाष्य करत अन्यायाविरोधात आवाज उठवणाऱ्या व्यक्तींच्या कथा मांडल्या. अन्याय आणि असमानतेविरोधातील लढ्यात सामूहिक प्रयत्नांची आणि युवा पिढीच्या सहभागाची भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. अन्याय किंवा अत्याचाराच्या घटनांमध्ये तडजोड करता येणार नाही, हा संदेश या सत्रातून देण्यात आला.
यानंतर ‘बी-टू-बी : ब्यूटी टू बिझनेस’ हे सत्र झाले. यामध्ये ‘सिम्पली नाम’च्या संस्थापक नम्रता सोनी आणि ‘फे ब्यूटी’च्या संस्थापक करिश्मा केवलरमानी सहभागी झाल्या. ब्यूटी इंडस्ट्रीमध्ये व्यवसाय सुरू करणे पूर्वी आव्हानात्मक वाटत होते; मात्र आता सौंदर्य क्षेत्र हे दैनंदिन जीवनाचा महत्त्वाचा भाग बनले आहे, असे दोन्ही उद्योजिकांनी सांगितले. ब्यूटी बिझनेस हा मॅरेथॉनसारखा असून त्यासाठी संयम आणि सातत्य आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
‘द व्हॉइस ऑफ रीझन’ या तिसऱ्या सत्रात NCP (SP)चे प्रवक्ते आणि झेवियर्सचे माजी विद्यार्थी अनीश गवांडे सहभागी झाले. गवांडे यांनी राजकारणात प्रवेश करण्याचा आपला प्रवास आणि त्यांना प्रभावित करणाऱ्या व्यक्ती व विचारांविषयी माहिती दिली. राजकारण्यांसाठी सामान्य नागरिकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे त्यांनी सांगितले. अलीकडील आंदोलनांच्या संदर्भात देशात आपले मत मांडणे हे नेहमीच आव्हानात्मक राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच नागरिकांचा नागरी समाज आणि राजकीय प्रक्रियेत सक्रिय सहभाग आवश्यक असल्यावर त्यांनी भर दिला.
दिवसाच्या अखेरच्या सत्राचे नाव ‘करेज टू केअर : व्हेअर पर्पज मीट्स प्रॅक्टिस’ असे होते. या सत्रात ‘बीच प्लीज इंडिया’चे संस्थापक मल्हार कालंबे आणि ‘मिशन ग्रीन मुंबई’चे संस्थापक सुभाजीत मुखर्जी सहभागी झाले. मल्हार कालंबे यांनी भारतातील समुद्रकिनाऱ्यांवरील अस्वच्छता पाहून आपल्याला वाईट वाटले आणि प्रत्यक्ष बदल घडवून आणण्यासाठी काम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
सुभाजीत मुखर्जी यांनी पर्यावरणाच्या स्थितीवर भाष्य करताना मागील पिढ्यांनी पुढील पिढ्यांसाठी पर्यावरणाच्या संवर्धनासमोर मोठी आव्हाने निर्माण केली आहेत, असे मत व्यक्त केले. सत्राच्या शेवटी मुखर्जी यांनी कॉलेजमधील विद्यार्थी आणि प्राध्यापकांचे आभार मानत त्यांना भारतीय तिरंगा भेट दिला.
‘मल्हार २०२६’ कॉन्क्लेव्ह १५ ऑगस्ट रोजी पुन्हा नव्या मान्यवरांसह रंगणार आहे. यावेळी FDA कमिश्नर तुकाराम मुंढे आणि बॉलिवूड दिग्दर्शक इम्तियाज अली कॉन्क्लेव्हच्या मंचावर सहभागी होणार आहेत. त्यामुळे दुसऱ्या दिवसाच्या सत्रांकडे विद्यार्थी, तरुण आणि विविध क्षेत्रांतील उपस्थितांचे लक्ष लागले आहे.