
कराड तालुक्यात खळबळ! ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांनीच चर खोदून बंद केले शेतरस्ते
गावातील उपसरपंच, सदस्य व तंटामुक्ती अध्यक्ष यांनी जेसीबीच्या साह्याने चर खोदून रस्ते अडवले आहेत. यामध्ये खिलपाटा रस्ता, इनामात जाणारा रस्ता, शिवारात जाणारा रस्ता, फाटातील रस्ता, भेरुखडी जाणारा रस्ता यासह अनेक महत्त्वाचे रस्ते बंद करण्यात आले आहेत. रस्ते बंद करणाऱ्या लोकांनी केवळ स्वतःच्या जमिनीपर्यंत जाण्यासाठी रस्ते खुले ठेवले आहेत. इतर शेतकऱ्यांची मात्र गैरसोय करण्यात आली आहे.
ज्या गावच्या ग्रामस्थांनी गावचा चांगला कारभार सोपवण्यासाठी ग्रामपंचायतीत प्रतिनिधित्वाची निवड केली. त्याच ग्रामस्थांना या ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्याकडून असा अनुभव मिळणे म्हणजे एक दुर्दैव व आश्चर्यचकित मानले जात आहे.ग्रामस्थांना नाहक त्रास देण्यासाठी उपद्वाप करीत असल्याची जोरदार चर्चा हेळगाव विभागात सुरू आहे. प्रशासनाने यात ताबडतोब हस्तक्षेप करून सर्व शेतरस्ते मोकळे करावेत. दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकऱ्यांसह ग्रामस्थांनी केली आहे.
या संदर्भात ग्रामस्थांनी तलाठी यांच्याशी संपर्क साधला. “मी यात काहीही करू शकत नाही” असे हे बेजबाबदारपणाचे उत्तर मिळाले. असे ग्रामस्थांनी स्पष्ट केले. वास्तविक हा विषय महसूल खात्याशी संबंधित येतो. या खात्याच्याच महसूल खात्याचा कारभार पाहणाऱ्या तलाठ्याने असे उत्तर देणे म्हणजे अकार्यक्षमपणाचे, बेजबाबदारपणाचे असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
आणखी त्यावर एक कढी म्हणजे ज्यांनी रस्ते बंद केले… तेच लोक त्याच दिवशी तहसीलदारांना रस्ते मोकळे करण्याचा घाट घालण्यासाठी तहसीलदारांच्याकडे निवेदन देण्यासाठी गेले होते. खायचे दात वेगळे… दाखवायचे वेगळे असाच एकंदरीत प्रकार ग्रामस्थांना अनुभवास मिळाला. खरीप हंगामात वेळेवर मशागत, पेरणी, चारा वाहतूक न झाल्यास शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होणार आहे.