
राज्यात उष्णतेचा कहर सुरूच; दोन महिन्यांत उष्माघाताचे 6 बळी
मुंबई : सध्या वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. अनेक ठिकाणी तापमानाचा पारा चढताना दिसत आहे. महाराष्ट्रात यंदा कडाक्याच्या उन्हामुळे उष्माघाताच्या प्रकरणांमध्ये मोठी वाढ झाली आहे. १ मार्च ते ९ मे या कालावधीत राज्यभरात उष्माघाताचे एकूण २३६ रुग्ण आढळले आहेत. तसेच, उष्माघाताच्या संशयास्पद कारणांमुळे ६ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती राज्य सरकारच्या अधिकृत आकडेवारीतून समोर आली आहे.
९ मे पर्यंत नोंदवलेल्या ६ संशयास्पद मृत्यूंपैकी लातूरमधील एकाचा मृत्यू उष्माघातामुळे झाल्याचे स्पष्ट झाले आहे. उर्वरित ५ प्रकरणांची वैद्यकीय तपासणी अद्याप सुरू आहे. यामध्ये अहिल्यानगरमधील २, तर अकोला, लातूर आणि सोलापूरमधील प्रत्येकी एका प्रकरणाचा समावेश आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये सर्वाधिक ८६ रुग्णांची नोंद झाली आहे. तर, मुंबईसह मुंबई महानगर क्षेत्रातही उष्णतेशी संबंधित लक्षणे असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, डिहायड्रेशन (पाणी कमी होणे), थकवा, उलट्या आणि डोकेदुखी अशा तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत आहे.
राष्ट्रीय हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रम अंतर्गत राज्य सरकार २०१९ पासून उष्माघाताचा जिल्हानिहाय डेटा गोळा करत आहे. आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिल महिन्यापासून राज्यात दीर्घकाळ उष्णतेची लाट कायम आहे, ज्यामुळे आजारांचे प्रमाण वाढले आहे.
नाशिकमध्ये तापमान चाळिशी पार
यंदाच्या हंगामात २५ एप्रिल रोजी ४१.५ अंश तापमानाची उचांकी नोंद झाली होती. तो विक्रम अवघ्या १५ दिवसांत मोडीत निघाला आहे. गेल्या २४ तासात कमाल तापमानात १.४ अंशाची वाढ नोंदविली गेली आहे. पारा चाळिशीपार राहिल्याने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. सोमवारी सकाळी ८.३० वाजल्यापासूनच उन्हाच्या असह्य झळा बसण्यास सुरुवात झाली.
कडाक्याच्या उन्हामुळे अनेक रस्ते ओस
सूर्याची किरणे थेट अंगावर आल्याने उन्हाचे तीव्र चटके सहन सोसावे लागले. दुपारी १२ ते ४ या वेळेत रस्ते ओस पडल्याचे पाहायला मिळाले. मुख्य बाजारपेठामध्ये शुकशुकाट दिसून आला. अत्यावश्यक कामाशिवाय कोणीही घराबाहेर पडताना दिसले नाही.