
Rain Updates: मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत; कुठे दरड कोसळली, कुठे पाणी साचलं? एका क्लिकवर जाणून घ्या सर्व अपडेट्स
रायगडमधील कुंडलिका नादीला पूर आला असल्याचे समोर आले आहे. यामुळे शहरात पाणी शिरलं असून रस्ते वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. या भागातील जनजीवन विस्कळीत झालं आहे. रस्ते बंद झाल्यामुळे अनेक नागरिक या ठिकाणी अडकले आहेत.
मुंबई पुणे मिसिंग लिंकच्या मोठ्या बोगद्या समोर मोठी दरड कोसळली असून पुढील आदेश येईपर्यंत मिसिंग लिंक वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आल्याचे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून सांगण्यात आले आहे.
ठाण्यात सोसाट्याच्या वाऱ्यामुळे भलं मोठं लोखंडी होर्डिंग रस्त्यावर कोसळल्याची घटना घडली आहे. ठाण्यातील पोखरण नंबर 2 परिसरात ही घटमा घडली आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे.
कोकणात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खेड तालुक्यातील कशेडी घाटातील नव्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर मोठी दरड कोसळल्याची घटना घडली आहे. दरडीसह मोठ्या प्रमाणात माती आणि दगड रस्त्यावर आल्याने महामार्गावरील वाहतूक तात्पुरती पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. घटनेनंतर पोलीस, महामार्ग प्रशासन आणि संबंधित यंत्रणांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचाव व रस्ता साफसफाईचे काम सुरू केले आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने दोन्ही बाजूंची वाहतूक थांबविण्यात आली असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सततच्या मुसळधार पावसामुळे डोंगरकड्यांवरून दरड कोसळण्याचा धोका वाढला असून प्रशासनाने नागरिकांना आणि प्रवाशांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावरील प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने परिस्थितीवर प्रशासनाकडून लक्ष ठेवले जात आहे.
मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने दोन्ही दिशेची वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सतत कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबई–पुणे एक्स्प्रेस हायवेवरील फूड मॉल परिसरात रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे.
सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने या ठिकाणी दोन्ही बाजूंची वाहतूक तात्पुरती बंद केली आहे. परिणामी मुंबईकडे आणि पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांच्या अनेक किलोमीटरपर्यंत रांगा लागल्या असून प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पाणी ओसरल्यानंतर आणि रस्त्याची पाहणी पूर्ण झाल्यानंतरच वाहतूक पूर्ववत करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे. वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Navi Mumbai News: वाशीत गीता अपार्टमेंटच्या सज्ज्याचा भाग कोसळला; एकाचा मृत्यू, महिला गंभीर जखमी
रायगडच्या कर्जतमधील उल्हास नदीला पूर आला आहे. उल्हास नदी किनाऱ्यावरील बेंडसे आणि वावे पूल पाण्याखाली गेले आहे. पूल पाण्याखाली गेल्याने परिसरातील गावांचा संपर्क तुटला आहे.
मीरा-भाईंदर शहरात सुरू असलेल्या तुफानी पावसामुळे मेट्रो-९ प्रकल्पातील दीपक हॉस्पिटलसमोरील मेडतिया मेट्रो स्थानकावर गंभीर प्रकार घडला. जोरदार वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे स्थानकावरील काही पत्रे (शीट्स) उडाल्याची घटना समोर आली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही तसेच कोणत्याही वाहनाचे किंवा नागरिकांचे नुकसान झाले नसल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या घटनेमुळे मेट्रो प्रकल्पाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. स्थानकावरील सुरक्षा उपाययोजना आणि बांधकामाच्या गुणवत्तेची चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
नालासोपारा पूर्वेकडील वाकनपाडा परिसरात घरावर भलं मोठे झाड कोसळलं. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच वसई-विरार महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले असून झाड हटविण्याचे काम सुरू आहे. हे धोकादायक झाड तोडण्यासाठी पालिकेला वारंवार तक्रार केली होती. मात्र अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच हे झाड घरावर कोसळले, असा आरोप घरमालकीण महिलेने केला आहे.